जेवणात मासे नसल्याने नवरदेवाने मोडलं लग्न; मंडपातच तुफान हाणामारी, शेवटी...
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
एका लग्न समारंभात जेवणात मासे न मिळाल्याने नवरदेव आणि वरातीतील लोकांनी मोठा गोंधळ घातला
लखनऊ : लग्नाचं एक अतिशय अजब प्रकरण समोर आलं आहे. यात एका लग्न समारंभात जेवणात मासे न मिळाल्याने नवरदेव आणि वरातीतील लोकांनी मोठा गोंधळ घातला. यानंतर नवरदेवाकडील आणि नवरीकडील लोकांमध्ये हाणामारीही झाली. शेवटी वऱ्हाडी तिथून पळून गेले. इतकंच नाही तर नवरदेवही आपल्या नातेवाईकांसह लग्न न करताच तिथून निघून गेला. ही अजब घटना उत्तर प्रदेशातील देवरिया येथील आहे.
बघौचघाट पोलीस स्टेशन हद्दीतील आनंदनगर गावातील रहिवासी दिनेश शर्मा यांच्या मुलीचं लग्न बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील कुर्थिया गावातील रहिवासी सुरेंद्र शर्मा यांचा मुलगा अभिषेक शर्मा याच्याशी ठरलं होतं. गुरुवारी 11 जुलै रोजी गोपालगंज येथून लग्नाची वरात देवरियाला आली. विवाह सोहळ्यात इतर विधी आणि वरमाळा विधी पार पडले होते. यानंतर वराचे मित्र जेवण घेण्यासाठी फूड स्टॉलकडे गेले.
advertisement
पुरी, भाजी, पनीर आणि पुलाव पाहिल्यावर आणि जेवणात मासे दिले जात नसल्याचे समजताच त्यांना राग आला. यानंतर त्यांनी वराकडे तक्रार केली की, आपण टिळ्याच्या कार्यक्रमात मासे दिले होते. येथे शाकाहारी जेवण बनवलं गेलं आहे. यावर वरालाही राग आला आणि त्याने मुलीच्या बाजूकडील लोकांना शिवीगाळ सुरू केली.
मग हा वाद इतका वाढला की लग्नात आलेल्या पाहुण्यांमध्ये हाणामारी सुरू झाली. यानंतर गावकरीही हाणामारी करू लागले. यादरम्यान कोणीतरी 112 वर डायल करून पोलिसांना फोन केला. पण, पोलीस येण्यापूर्वीच लग्नाचे काही पाहुणे पळून गेले. एवढंच नाही तर वरही लग्न न करताच नातेवाईकांसह तिथून पळून गेला. त्याचवेळी पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणं गाठलं.
advertisement
मुलीची आई मीरा शर्मा यांनी सांगितलं की, 'द्वार पूजा करण्यात आली होती. यानंतर वरमाळेचा कार्यक्रमही झाला. यादरम्यान वराने कोणते पदार्थ बनवले आहेत, असं विचारलं. यावर मुलीने सांगितलं की, साधं जेवण तयार केलं आहे. यावर वराने मासे का बनवले नाही असं विचारत मुलीला चापट मारली. यानंतर त्याने मला आणि माझ्या पतीला चापट मारली. याशिवाय लग्नातील 10 पाहुण्यांनी घरातील सदस्यांना मारहाण करून जखमी केलं.'
advertisement
पोलीस स्टेशन प्रभारी राजेश पांडे यांनी सांगितलं की, जयमाला विधी पूर्ण झाला होता. दारूच्या नशेत असलेल्या वर आणि त्याच्या मित्रांना जेवणात पुरी, भाजी आणि पुलाव पाहून राग आला आणि वाद सुरू झाला. वधूला चापट मारल्याचीही माहिती आहे. वरासह लग्नातील पाहुणे लग्न न करताच परतले आहेत. या प्रकरणी मुलीचे वडील दिनेश शर्मा यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वर अभिषेक शर्मा, सुरेंद्र शर्मा, राम प्रवेश शर्मा, राजकुमार आणि काही अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 14, 2024 10:35 AM IST


