Mumbai Food: यश अन् श्रुतीनं डोकं लावलं, चायनिज भेळ खायला मुंबईकरांच्या रांगा, का आहे खास? Video
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Food: दोघेही दिवसभर आपापल्या नोकऱ्या करतात आणि त्यानंतर वेळेचे योग्य नियोजन करून संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत ‘स्ट्रीट रसोई’ सुरू करतात.
मुंबई: सध्या स्ट्रीट फूडमध्ये चायनीज भेळला मोठी मागणी आहे. अगदी 10 ते 20 रुपयांत मिळणारी ही चायनीज भेळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ली जाते. मात्र बाजारात मिळणारी बहुतांश चायनीज भेळ ही अजिनोमोटो, रेड कलर, रेडीमेड शेजवान चटणी आणि जास्त मसाल्यांपासून तयार केली जाते. हे घटक आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. हीच बाब लक्षात घेऊन जोगेश्वरीतील मेघवाडी परिसरात राहणाऱ्या श्रुती आणि यश या दोन मित्र-मैत्रिणींनी एक वेगळा आणि आरोग्यदायी पर्याय देण्याचा निर्णय घेतला आणि ‘स्ट्रीट रसोई’ या नावाने पार्टटाइम व्यवसाय सुरू केला. सध्या त्यांच्या स्टॉलवर खवय्यांची मोठी गर्दी होतेय.
श्रुती आणि यश यांचा स्टॉल मेघवाडी परिसरात असून येथे रोज संध्याकाळी गर्दी पाहायला मिळते. या ठिकाणी मिळणारी चायनीज भेळ पूर्णपणे घरगुती पद्धतीने तयार केली जाते. शेजवान चटणीपासून ते इतर सर्व मसाले हे स्वतः घरी बनवतात. यामध्ये कोणतेही कलर, प्रिझर्वेटिव्ह किंवा रेडीमेड पदार्थ वापरले जात नाहीत. आपण घरच्या जेवणात वापरतो तेच मसाले थोड्या वेगळ्या पद्धतीने तयार करून चायनीज भेळमध्ये वापरले जातात. त्यामुळे या चायनीज भेळीची चव इतर ठिकाणच्या भेळीपेक्षा वेगळी आणि खास आहे.
advertisement
चायनीज भेळ ही सहसा लाल भडक रंगाची दिसते, मात्र इथे मिळणारी भेळ नैसर्गिक रंगाची असून ती अधिक ताजी आणि आरोग्यदायी आहे. घरगुती चटण्यांमुळे तिची चव अधिक खुलून येते, असे ग्राहक सांगतात.
‘स्ट्रीट रसोई’मध्ये चायनीज भेळसोबत मोमोजदेखील मिळतात. बाहेर साधारण 60 ते 70 रुपयांना मिळणारे मोमोज येथे फक्त 40 रुपयांना उपलब्ध आहेत. येथे व्हेज मोमोज, पनीर मोमोज, कॉर्न मोमोज आणि मसाला मोमोज असे विविध प्रकार मिळतात.
advertisement
यश आणि श्रुती यांचा हा व्यवसाय पूर्णपणे पार्ट टाइम स्वरूपाचा आहे. यश पेशाने इंजिनियर असून श्रुती शिक्षिका आहे. दोघेही दिवसभर आपापल्या नोकऱ्या करतात आणि त्यानंतर वेळेचे योग्य नियोजन करून संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत ‘स्ट्रीट रसोई’ सुरू करतात.
या ठिकाणी स्वच्छतेला विशेष महत्त्व दिले जाते. पिण्यापासून ते पदार्थ बनवण्यासाठी वापरले जाणारे सर्व पाणी उकळूनच वापरले जाते. सर्व साहित्य ताजे वापरले जाते आणि परिसर स्वच्छ ठेवला जातो. त्यामुळेच खवय्यांची मोठी गर्दी याठिकाणी होत असते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 1:00 PM IST
मराठी बातम्या/Food/
Mumbai Food: यश अन् श्रुतीनं डोकं लावलं, चायनिज भेळ खायला मुंबईकरांच्या रांगा, का आहे खास? Video






