स्वयंपाक घराचा खर्च वाढला, मसाल्यांच्या दरात मोठी वाढ, कारण काय?
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
गरम मसाल्यांमध्ये मिरची हा महत्त्वाचा घटक आहे. यावर्षी मिरचीच्या उत्पादनावरही परिणाम झाल्याने तिचे दर वाढले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : स्वयंपाकघरातील अत्यावश्यक मानले जाणारे गरम आणि खडा मसाल्यांचे दर गेल्या महिनाभरात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. विशेषतः मिरचीच्या दरवाढीचा परिणाम इतर मसाल्यांवरही झाला असून अनेक लवंग, दालचिनीसह विविध मसाल्यांच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांच्या मते काही मसाल्यांच्या दरात प्रतिकिलो 100 रुपयांपासून ते 250 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
जिऱ्याचे भाव या अगोदर 500 रुपये प्रति किलो होते, आता मात्र 800 किलो पर्यंत पोहोचले आहेत, तसेच इलायची 3200 रुपये प्रति किलो होती आणि आता 3600 रुपये इतकी आहे. सध्या लग्नसराई, सणवार आणि रमजान महिन्यामुळे मसाल्यांची मागणी वाढली असून त्याचाही दरवाढीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. तसेच याबद्दल सविस्तर माहिती मसाले व्यापारी आणि किराणा दुकानदार ललित धोका यांच्याकडून लोकल 18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
आता नेमकं मसाल्यांचे दर का वाढले?
मसाल्यांच्या दरवाढीमागे अनेक कारणे असल्याचे व्यापारी सांगतात. यंदा लागवडीच्या काळात काही भागांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे जिरे, धणे आणि इतर मसाला पिकांचे मोठे नुकसान झाले. पिकांचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात मसाल्यांची आवक घटली. पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे मसाल्यांचे दर वाढले. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मसाल्याला मागणी जास्त असते, याबरोबरच वाहतूक खर्च आणि साठवणुकीच्या खर्चातही वाढ झाल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर झाला, ललित धोका यांनी म्हटले आहे.
advertisement
मिरचीच्या दरवाढीचा मोठा परिणाम
गरम मसाल्यांमध्ये मिरची हा महत्त्वाचा घटक आहे. यावर्षी मिरचीच्या उत्पादनावरही परिणाम झाल्याने तिचे दर वाढले आहेत. मिरची महागल्यामुळे गरम मसाला तयार करण्याचा खर्च वाढला. त्यामुळे बाजारात तयार मसाले तसेच खडा मसाला दोन्हींच्या किमती वाढल्या आहेत. व्यापाऱ्यांच्या मते मिरचीच्या दरातील वाढ ही सध्याच्या मसाला बाजारातील दरवाढीचे प्रमुख कारण मानली जात आहे.
advertisement
लग्नसराई, सणवार आणि रमजानमुळे मागणी वाढली
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून विविध कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात मसाल्यांचा वापर केला जातो. त्याचबरोबर सणवार आणि रमजान महिन्यामुळेही स्वयंपाकात मसाल्यांचा वापर वाढतो. त्यामुळे बाजारात मसाल्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागणी वाढल्याने व्यापाऱ्यांनीही दर वाढवल्याचे दिसून येत आहे.
घराघरांत रेडीमेड मसाल्यांचा वापर वाढला
पूर्वी घराघरांत मिरची, धणे, जिरे यांसारखे मसाले वेगवेगळे आणून घरच्या घरी दळून वापरण्याची पद्धत होती. मात्र सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे रेडीमेड मसाल्यांचा वापर वाढला आहे. बाजारात विविध कंपन्यांचे पॅकिंग मसाले उपलब्ध असून ग्राहकांकडून त्यांना मोठी मागणी आहे. तरीही अनेक कुटुंबांमध्ये अस्सल चव मिळण्यासाठी खडा मसाला खरेदी करून घरगुती पद्धतीने मसाला बनवण्याची परंपरा कायम आहे.
advertisement
आगामी काळात दर स्थिर राहण्याची शक्यता
व्यापाऱ्यांच्या मते सध्या मसाल्यांचे दर वाढले असले तरी भविष्यात मोठी दरवाढ होण्याची शक्यता कमी आहे. कारण मसाल्यांचे उत्पादन भारतासह इतर काही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात होते. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये मसाल्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्यामुळे आगामी काळात बाजारात पुरवठा वाढल्यास मसाल्यांचे दर स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 4:13 PM IST








