६ लाखांचे लाच प्रकरण, मंत्रालयातील बडा मासा ACB च्या जाळ्यात, कोर्टात काय घडलं?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
मंत्रालयातील अर्थ व नियोजन विभागात कक्ष अधिकारी विलास लाड याला लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. ८ एप्रिलपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मुंबई : राज्य सरकारने लाचखोर अधिकाऱ्यांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेत मंत्रालयातील अर्थ व नियोजन विभागाचा एक 'बडा मासा' लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) गळाला लागला. ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच घेताना कक्ष अधिकारी विलास लाड याला रंगेहात अटक करण्यात आली आहे. आज त्याला सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामविकास विभागांतर्गत येणारा निधी मंजूर करून देण्याच्या बदल्यात विलास लाड याने लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, एसीबीने नवी मुंबईतील खारघर परिसरात सापळा रचला.
एसीबीकडून खारघरमध्ये अधिकाऱ्याला रंगेहात अटक
विलास लाड हा ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच स्वीकारण्यासाठी खारघरमध्ये आला असता, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला ट्रॅप रचून रंगेहात पकडले. मंत्रालयातील महत्त्वाच्या विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यावर ही कारवाई झाल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
कोर्टात आज काय घडलं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचखोर आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध मोहीम उघडली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून गेल्या काही दिवसांपासून विविध विभागांतील लाचखोर अधिकारी एसीबीच्या निशाण्यावर आहेत. अर्थ आणि नियोजन सारख्या महत्त्वाच्या विभागाचा अधिकारी लाच घेताना पकडला गेल्याने या मोहिमेला मोठे यश मानले जात आहे. दरम्यान, सत्र न्यायालयाने विलास लाड याला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिल्याने, आता या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कुठेपर्यंत पोहोचले आहे, हे पोलीस चौकशीतून समोर येणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 8:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
६ लाखांचे लाच प्रकरण, मंत्रालयातील बडा मासा ACB च्या जाळ्यात, कोर्टात काय घडलं?








