Youngster Death: मोह झाला अन् जीवानीशी गेला, अकोल्याच्या युवकासोबत घडलं भयंकर
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
पोहण्याचा मोह झाला आणि त्यामुळे एक युवक जीवानिशी गेला ! पातूरच्या धोदानी धबधबा येथे अकोला येथील युवकाचा बुडून मृत्यू...
पातूर, अकोला: (कुंदन जाधव, प्रतिनिधी) अकोल्याच्या पातूर तालुक्यातील धोदानी धबधब्याच्या डोहात अकोला येथील एका 19 वर्षे वयाच्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारी 1 वाजता मयताचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी पाण्यातून बाहेर काढला आहे. पातूर तालुक्यातील धोदानी धबधब्याच्या परिसरामध्ये अकोला येथील काही तरुण पर्यटनासाठी गेले होते. धबधब्यापासून काही अंतरावर निवांत ठिकाणी पाण्याच्या कडेला ते पर्यटनाचा आनंद घेत होते. या तरुणांना पोहण्याचा मोह न आवरल्याने सर्वजण पाण्यात उतरले.
या तरुणांबरोबरच निखिल नंदू पाखरे (वय 18) रा. सरकारी गोडाऊन मागे,अकोला हा सुद्धा पोहोण्यासाठी पाण्यात उतरला; मात्र त्याला व्यवस्थित पोहता येत नव्हते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. घटनेची माहिती पातूर पोलिसांना मिळताच तात्काळ पोलीस मदतीसाठी धावले. तरुणाचा मृतदेह दुपारी 1 वाजताच्या दरम्यान पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पाण्यातून वर काढला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आला. पातूर पोलीस स्टेशनला घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
advertisement
नागरिक बेफिकीर की प्रशासनाचं दुर्लक्ष? मात्र दोन दिवसआधीच अकोला जिल्हाधिकारी यांनी लोणावळा येथील भुशी धरणावर घडलेल्या घटनेच्या पर्शवभूमीवर आवश्यक उपाय योजनेबाबत विविध विभागांसाठी परिपत्रक काढले होते. त्यात संभाव्य आपत्तीप्रवण स्थळे आढळल्यास व तिथे उपाययोजना करणे शक्य नसल्यास अशी ठिकाणे पर्यटकांसाठी बंद राहणार, जल पर्यटनस्थळी बचाव पथके राहणार, पावसाळ्यात नदी, तलाव, धबधबे, गडकिल्ले अश्या पर्यटनस्थळी आपत्तीची घटना घडू नये यासाठी उपाय योजना करणार असल्याचे नमूद केले आहे. मात्र आदेशाच्या दोनच दिवसांनी ही घटना घडल्याने जिल्हा प्रशासनाने नेमकी कोणती उपाय योजना केली यावर प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे.
advertisement
पावसाळी पर्यटनादरम्यान काळजी घ्या: काही दिवसांपूर्वी लोणावळ्याच्या भूशी डॅम परिसरात घडलेल्या दुर्घटनेचा व्हिडिओ चांगलाचं व्हायरल झाला होता. त्यानंतर प्रशासन सतर्क आहे. असं असलं तरी आपण स्वत: आपल्या जीवाची काळजी घेणं देखील महत्वाचं आहे. पावसाळ्यात दरड कोसळणे, पाण्याचा प्रवाह अचानक वाढणे अशा दुर्घटना सातत्याने घडत असतात. त्यामुळे शक्यतो पावसाचा अंदाज घेऊनच आपण पर्यटनासाठी घराबाहेर पडणे, आपल्या फायद्याचे आहे. अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रशासन देखील बंदीच्या सूचना जारी करत असते, अशा सूचनांकडे सजग नागरिकांनी दुर्लक्ष करू नये. काळजी घ्यावी.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 13, 2024 6:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अकोला/
Youngster Death: मोह झाला अन् जीवानीशी गेला, अकोल्याच्या युवकासोबत घडलं भयंकर