कल्याणमध्ये नाश्ता अन् लातूरमध्ये जेवण! ४५० किलोमीटर अंतर, जनकल्याण महामार्गाचे संरेखन निश्चित, कोणत्या जिल्ह्यांतून जाणार?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Jankalyan Mahamarg : राज्यातील दळणवळण अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) महत्त्वाकांक्षी कल्याण–लातूर जनकल्याण महामार्ग प्रकल्प हाती घेतला आहे.
मुंबई : राज्यातील दळणवळण अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) महत्त्वाकांक्षी कल्याण–लातूर जनकल्याण महामार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. या महामार्गामुळे मुंबई आणि ठाणे येथून लातूरपर्यंतचा प्रवास केवळ ५ तासांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या हा प्रवास पूर्ण करण्यासाठी सुमारे १२ तास लागतात.
४५० किमीचा नवा महामार्ग
या प्रकल्पाचे संरेखन (अलाइनमेंट) पूर्ण झाले असून प्रस्तावित महामार्गाची लांबी सुमारे ४५० किलोमीटर असेल. येत्या ८ ते १० दिवसांत अंतिम प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सहा जिल्ह्यांना जोडणारा मार्ग
नवीन महामार्ग ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशीव आणि लातूर या सहा जिल्ह्यांतून जाणार आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक सुलभ होणार असून आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे.
advertisement
प्रवास वेळेत मोठी बचत
सध्या मुंबई-लातूर प्रवासासाठी पुणे-सोलापूर किंवा बार्शीमार्गे जावे लागते, ज्यामुळे १२ तासांहून अधिक वेळ लागतो. मात्र या नवीन महामार्गामुळे हा प्रवास अवघ्या ५ तासांत पूर्ण होणार असून वेळ आणि इंधनाची मोठी बचत होईल.
बीड आणि धाराशीवचा समावेश
महामार्गाच्या मार्गावरून बीड किंवा धाराशीव जिल्ह्यांना वगळल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने सुवर्णमध्य साधत महामार्गाला दोन्ही जिल्ह्यांची जोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे. अंतरबदल मार्गाद्वारे (कनेक्टिव्हिटी रोड) या जिल्ह्यांना जोडले जाणार आहे.
advertisement
अनेक वर्षांपासून रखडलेला प्रकल्प
हा महामार्ग प्रकल्प अनेक वर्षांपासून कागदावरच होता. मात्र राज्य सरकारने नुकतीच यास मंजुरी दिल्यानंतर प्रकल्पाला गती मिळाली आहे. सध्या संरेखन निश्चितीचे काम पूर्ण झाले असून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांचा दुजोरा
एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी या प्रकल्पाच्या प्रगतीला दुजोरा दिला असून लवकरच प्रस्ताव अंतिम करून शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
advertisement
दरम्यान, हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मराठवाडा आणि मुंबई दरम्यानची दळणवळण व्यवस्था मोठ्या प्रमाणात सुधारेल. उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक नागरिकांसाठीही हा प्रकल्प अत्यंत लाभदायक ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 8:19 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कल्याणमध्ये नाश्ता अन् लातूरमध्ये जेवण! ४५० किलोमीटर अंतर, जनकल्याण महामार्गाचे संरेखन निश्चित, कोणत्या जिल्ह्यांतून जाणार?









