लोकसभेआधी माझ्याशी संपर्क साधला, म्हणाले पैसा द्या निवडून आणतो, पण... राष्ट्रवादीच्या खासदाराचं मोठं वक्तव्य
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Sharad Pawar: राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेने देशभरात गजहब माजलेला असताना शरद पवार यांनी नागपूरमध्ये बोलताना, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोन व्यक्तींनी मला १६० जागा जिंकण्याची गॅरंटी दिली होती असे सांगून खळबळ उडवून दिली.
नागपूर: विधानसभा निवडणुकीआधी दोन व्यक्तींनी मला १६० जागा जिंकण्याची गॅरंटी दिली होती, परंतु लोकांवर आणि लोकशाहीवर विश्वास असल्याने आम्ही त्या मार्गाला गेलो नाही, असे विधान मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. त्यांच्या वक्तव्याची देशात चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनीही असाच दावा करून खळबळ उडवून दिली आहे. आमच्याकडेही असे लोक आले होते, त्यांनी काही पैशांची मागणी केली, असे अमर काळे म्हणाले.
काँग्रेसचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर आरोप करून मतदान प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे सांगितले. किंबहुना निवडणूक आयोग आणि भाजपने मिळून मतचोरी केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेने देशभरात गजहब माजलेला असताना शरद पवार यांनी नागपूरमध्ये बोलताना, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोन व्यक्तींनी मला १६० जागा जिंकण्याची गॅरंटी दिली होती असे सांगून खळबळ उडवून दिली. त्यांचीच री ओढत राष्ट्रवादीचे खासदार अमर काळे यांनी लोकसभा निवडणुकीतही अशी माणसे कार्यरत होती, याकडे लक्ष वेधले.
advertisement
आम्हीच कमी पडतोय, खासदार अमर काळे यांचा घरचा आहेर
निवडणूक आणि मतदान प्रक्रियेवर लोकांना शंका आहे. परंतु असे असतानाही विरोधी पक्ष म्हणून आपल्या रस्त्यावर उतरलो नाही, आपले सगळ्यांचे हे अपयश आहे. अनेकांच्या तक्रारी मला येत आहेत. आपण कमी पडतोय, असा घरचा आहेरही खासदार अमर काळे यांनी दिला.
लोकसभा निवडणुकीपूर्वी काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधला होता. अमुक एका रकमेची मागणी करून, एवढे पैसे द्या.... आम्ही तुम्हाला निवडून देतो, असे त्यांनी सांगितले. तसेच नागपूरचे आमचे दुनेश्वर पेठे यांच्याकडे विधानसभा निवडणुकीत दोन कोटींची मागणी केली होती. जर तुम्ही रकमेची पूर्तता केली तर तुम्हाला निवडून देऊ, असे त्यांनी आम्हाला सांगितले. परंतु आम्ही त्या वाटेला गेलो नाही, असे खासदार काळे यांनी सांगितले.
advertisement
'त्या' दोन व्यक्तींविषयी शरद पवार नेमके काय म्हणाले?
विधानसभा निवडणूक काळात दोन व्यक्ती माझ्याकडे आले होते. त्यावेळी राज्यातील २८८ जागांपैकी १६० जागा तुम्हाला जिंकवून देतो, अशी खात्री मला त्यांनी दिली होती. नंतर मी त्या दोन व्यक्तींना काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भेटवले. परंतु आम्ही त्या रस्त्याला गेलो नाही. लोकांमध्ये जाऊन त्यांचा विश्वास जिंकूनच आपण पुढे गेलो पाहिजे, असे माझे स्पष्ट मत होते, असे विधान शरद पवार यांनी केले.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
August 09, 2025 3:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लोकसभेआधी माझ्याशी संपर्क साधला, म्हणाले पैसा द्या निवडून आणतो, पण... राष्ट्रवादीच्या खासदाराचं मोठं वक्तव्य