मध्यरात्री स्फोटासारखे आवाज अन् घबराट! पोलिसांची धावपळ,अखेर गूढ उकललं; रत्नागिरीच्या समुद्रात नेमकं काय घडलं?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
अचानक आणि जोरदार आवाजांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली होती, तर सोशल मीडियावर विविध अफवा पसरल्याने चर्चांना उधाण आले.
राजेश जाधव, प्रतिनिधी
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील माडबन आणि विजयदुर्ग परिसरात शनिवारी रात्री समुद्रातून स्फोटासारखे मोठे आवाज ऐकू आल्याने किनारपट्टी भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. खोल समुद्रातून, सुमारे 20 नॉटिकल मैल अंतरावरून हे आवाज येत असल्याचे प्राथमिक अंदाज होते. अचानक आणि जोरदार आवाजांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली होती, तर सोशल मीडियावर विविध अफवा पसरल्याने चर्चांना उधाण आले.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच तटरक्षक दल आणि पोलीस प्रशासनाने तातडीने तपास सुरू केला. रात्रीपासूनच पोलिस यंत्रणा आणि तटरक्षक दल समुद्रातील या गूढ आवाजांचा माग काढत होते. अखेर रविवारी सकाळपर्यंत या आवाजांचे गूढ उकलण्यात यंत्रणांना यश आले. खोल समुद्रातून जाणाऱ्या टग म्हणजेच मोठ्या मालवाहू बोटीवरून सिग्नल पिस्टलमधून फायर केल्यामुळे हे स्फोटासारखे आवाज निर्माण झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली.
advertisement
नेमकं काय आहे प्रकरण?
पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रात मार्गक्रमण करताना काही वेळा टग बोटीवरील कर्मचारी सिग्नल देण्यासाठी सिग्नल पिस्टलचा वापर करतात. त्यातून होणाऱ्या फायरचा आवाज मोठ्या प्रमाणावर दूरपर्यंत ऐकू जातो. शनिवारी रात्री अशाच प्रकारे सिग्नल पिस्टलमधून फायर केल्याने हे आवाज माडबनपासून विजयदुर्गपर्यंतच्या किनारपट्टी परिसरात ऐकू आले.
अखेर वास्तव समोर
advertisement
या आवाजांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. काही ठिकाणी स्फोट, युद्धसराव किंवा अन्य संशयास्पद हालचालींच्या अफवा पसरल्या. परिणामी पोलिस आणि तटरक्षक दलावर चौकशीसाठी नागरिकांचे फोन येऊ लागले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ तपास सुरू करत वास्तव समोर आणले.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास थेट पोलिस किंवा तटरक्षक दलाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. समुद्रातील वाहतूक, मासेमारी नौका आणि मालवाहू बोटींच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमित गस्त सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले. या घटनेचे गूढ उकलल्याने किनारपट्टी भागातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला असून, प्रशासनाच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती.
advertisement
Location :
Ratnagiri,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 3:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मध्यरात्री स्फोटासारखे आवाज अन् घबराट! पोलिसांची धावपळ,अखेर गूढ उकललं; रत्नागिरीच्या समुद्रात नेमकं काय घडलं?









