Society Cleaning: तुमच्या सोसायटीत कबुतरांनी घरं केली? होऊ शकतो सगळ्यांना गंभीर आजार
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Society Cleaning: मुंबई-पुण्यासारख्या शहरांतील सोसायट्यांमध्ये कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कबुतरं मोठ्या थव्यांमध्ये राहतात आणि त्यांच्या विष्ठेतून बॅक्टेरिया, व्हायरस आणि बुरशीजन्य घटक पसरतात.
पुणे : शहरात कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या आरोग्याची समस्या अधिक गंभीर होत चालल्या आहेत. कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या श्वसनासंबंधी आजारांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याची माहिती ससून रुग्णालयातील श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. संजय गायकवाड यांनी दिली. कबुतरांच्या विष्ठेतून बाहेर पडणारे विषाणू आणि बुरशीजन्य कण शरीरात गेल्यास 'हायपरसेन्सिटिव्ह न्यूमोनिया' नावाचा आजार होतो. या आजारामुळे फुफ्फुसांचं गंभीर नुकसान होतं. या आजारामुळे रुग्णांना श्वसनाच्या समस्या निर्माण होतात. परिस्थिती बिघडल्यास फुफ्फुस प्रत्यारोपण (लंग ट्रान्सप्लांट) करण्याचीही वेळ येऊ शकते.
डॉ. गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर आठवड्याला ससून रुग्णालयात 3 ते 4 रुग्ण कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या आजारांसाठी दाखल होत आहेत. हे रुग्ण मुख्यत्वे हायपरसेन्सिटिव्ह न्यूमोनियाने ग्रस्त असतात. या आजारात फुफ्फुसांना सूज येते, श्वास घेण्यात अडथळा निर्माण होतो आणि सतत दम लागतो. उपचार वेळेवर न झाल्यास फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. काहीवेळा रुग्णांना सामान्य हालचाल करणेही अशक्य होतं. अखेरीस फुफ्फुस प्रत्यारोपणाशिवाय पर्याय राहत नाही.
advertisement
मानवी वस्तीच्या जवळच कबुतरांचं मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असल्याने हा धोका अधिक गंभीर बनला आहे. डॉ. गायकवाड यांनी सांगितलं की, कबुतरं मोठ्या थव्यांमध्ये राहतात आणि त्यांच्या विष्ठेतून बॅक्टेरिया, व्हायरस आणि बुरशीजन्य घटक पसरतात. हे सूक्ष्मकण हवेत मिसळतात आणि श्वसनमार्गाने मानवी शरीरात जातात. त्यामुळे फुफ्फुसांचं नुकसान होते. रुग्णांना दम लागणे, हृदयावर ताण येणे आणि शारीरिक हालचालींमध्ये अडचण अशा अडचणींचा सामना करावा लागतो. उपचार करूनही हे आजार पूर्णपणे बरे होत नाहीत. त्यामुळे आयुष्यभर त्याचा त्रास सहन करावा लागतो.
advertisement
कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या आजारांमध्ये सुरुवातीला थकवा, सौम्य खोकला, श्वास घेताना त्रास, अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे गंभीर होऊन सतत धाप लागणे, जास्त थकवा आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. अशा स्थितीत रुग्णांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होतं. वेळेत निदान आणि योग्य उपचार न झाल्यास हा आजार प्राणघातक ठरू शकतो.
या आजारापासून बचाव करण्यासाठी काही सोप्या उपायांची माहिती देताना डॉ. गायकवाड म्हणाले, ज्या ठिकाणी कबुतरांची वस्ती आहे, तिथे मास्क लावणं गरजेचं आहे. घरात कबुतरं येऊ नयेत म्हणून खिडक्यांना बर्ड नेट लावणं फायदेशीर ठरेल. कबुतरांच्या विष्ठेचा संपर्क टाळणे आणि स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी असंही स्पष्ट केलं की, ग्रामीण भागात पारव्यांमुळेही असेच धोके संभवतात. कारण, पारवा हा पक्षी देखील मोकळ्या मैदानांवर आणि पाण्याजवळ घरटी करतो.
advertisement
पुण्यात कबुतरांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने या समस्येकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. प्रशासनाने कबुतरांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, या धोक्याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात श्वसनरोगांच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढू शकते.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
August 19, 2025 4:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Society Cleaning: तुमच्या सोसायटीत कबुतरांनी घरं केली? होऊ शकतो सगळ्यांना गंभीर आजार

