बहिणीची ती भेट शेवटची..., जोतिबाचं दर्शन घेतलं, परत जाताना भयंकर घडलं, 48 तासांनी पंचगंगेत आढलला मृतदेह
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Kolhapur News: अरुण यांनी बंधाऱ्याच्या पूर्वेच्या बाजूला नदीपात्रात उडी मारली. मात्र, या ठिकाणी प्रवाह गतिमान होता, आणि पात्राचा विस्तार देखील अधिक होता.
कोल्हापूर: वाडी रत्नागिरी येथे जोतिबाचे दर्शन घेऊन आलेल्या दुर्गमानवाडच्या भक्ताचा पंचगंगा नदीपात्रात दुर्दैवी अंत झाला. शिंगणापूर बंधाऱ्यावर आंघोळीसाठी थांबले असता अरुण धोंडिराम गुरुव (वय 38) यांचा बुडून मृत्यू झाला. तब्बल 48 तासांच्या शोधमोहिमेनंतर शुक्रवारी दुपारी मृतदेह शोधण्यात आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश आले. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अरुण गुरुव हे राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाडच्या विठलाई देवी मंदिराचे पुजारी होते. चैत्र यात्रेनिमित्त ते बुधवारी जोतिबा डोंगरावर गेले होते. दर्शन घेऊन परतताना त्यांनी बहिणीकडे मुक्काम केला. गुरुवारी सकाळी मित्रासह ते गावाकडे परत जात होते. तेव्हा सकाळी साडेसातच्या सुमारास आंघोळ करण्यासाठी शिंगणापूर बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीपात्रात उतरले होते.
advertisement
अंदाज चुकला आणि जीव गेला
अरुण यांनी बंधाऱ्याच्या पूर्वेच्या बाजूला नदीपात्रात उडी मारली. मात्र, या ठिकाणी प्रवाह गतिमान होता, आणि पात्राचा विस्तार देखील अधिक असल्याने त्यांना अंदाज आला नाही. ते पोहत बऱ्याच अंतरापर्यंत पाण्यात गेले. मात्र, माघारी येताना त्यांची दमछाक झाली. तेव्हा ते पाण्यात बुडत असल्याचे पाहून काठावरील नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. तसेच त्यांना वाचवण्यासाठी ट्यूब देखील भिरकावल्या. मात्र, त्या पकडण्यात त्यांना अपयश आले आणि ते पाण्यात बुडाले.
advertisement
आपत्ती व्यवस्थापन विभागाची शोधमोहीम
दरम्यान, बंधारा परिसरात तरुण बुडाल्याची माहिती मिळताच करवीर पोलीस, तलाठी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. गुरुवारी दिवसभर शोधमोहीम सुरू होती. मात्र, सायंकाळी अचानक आलेला पाऊस, आणि वाढत्या अंधारामुळे मोहीम थांबवावी लागली. शुक्रवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. तेव्हा दुपारी बाराच्या सुमारास अरुण यांचा मृतदेह सापडला.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 12:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
बहिणीची ती भेट शेवटची..., जोतिबाचं दर्शन घेतलं, परत जाताना भयंकर घडलं, 48 तासांनी पंचगंगेत आढलला मृतदेह






