मुंबईत मनसेला मोठं भगदाड, पक्ष निर्मितीपासून साथ देणाऱ्या 11 जणांचा तडकाफडकी राजीनामा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मुंबईच्या वांद्रे येथील मनसेच्या बालेकिल्ल्यात पक्षाला मोठे खिंडार पडलं. पक्ष निर्मितीपासून निष्ठावंत राहिलेल्या ११ जणांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत.
सुस्मिता भदाणे, प्रतिनिधी मुंबई: मुंबईत ठाकरे बंधूंची युती झाल्यामुळे मराठी माणसाची ताकद वाढणार, दोन्ही पक्षांना फायदा होणार, अशी चर्चा सुरू असताना मनसेसाठी धक्का देणारी बातमी समोर आली आहे. वांद्रे येथील मनसेच्या बालेकिल्ल्यात पक्षाला मोठे खिंडार पडलं. प्रभाग क्रमांक ९७ आणि ९८ मधील तब्बल ११ प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या 'मशाल' चिन्हावर उमेदवार रिंगणात उतरवल्याने पक्ष निर्मितीपासून निष्ठावंत राहिलेले मनसैनिक नाराज झाले. यातूनच त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. या बंडाचा मनसेला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
19 वर्षे 9 महिन्यांची साथ सुटली
राजीनामा देणाऱ्या या पदाधिकाऱ्यांनी गेल्या १९ वर्षे ९ महिन्यांपासून राज ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. मनसेच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या या सैनिकांनी अचानक राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नेमके वादाचे कारण काय?
वांद्रे येथील प्रभाग क्रमांक ९७ आणि ९८ मध्ये उमेदवारी वाटपावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. इथं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (UBT) उमेदवार बाळा चव्हाण हे 'मशाल' चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तर दुसरीकडे, मनसेच्या वतीने दिप्ती काते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इथं ठाकरे बंधुची युती झाली असली तरी याच प्रभागामधून मनसेकडून इच्छुक असणाऱ्या निष्ठावंताना डावलल्याची भावना आहे. यातूनच अनेक वर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत.
advertisement
त्यांनी एक पत्र पाठवून सामूहिक राजीनामे सादर केले आहेत. राज ठाकरे यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात संबंधित पदाधिकाऱ्यांनी ९ मार्च २००६ ते ३१ डिसेंबर २०२५ अशा १९ वर्षे ९ महिन्याच्या अविस्मरणीय राजकीय प्रवासाला अखेरचा जय महाराष्ट्र... अशी एकच ओळ लिहिली आहे. ९ मार्च २००६ रोजी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. तेव्हापासून आपण सोबत होतो, तरीही डावलण्यात आलं, असा संदेश देण्याचा प्रयत्न या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
advertisement
राजीनामा कुणी कुणी दिला?
विजय काते- उपविभाग अध्यक्ष
जितेंद्र गावडे - शाखा अध्यक्ष
भाऊराव विश्वासराव - शाखा सचिव
विजय कुलकर्णी- उपशाखा अध्यक्ष
अॅड. अशोक शुक्ला - उपशाखा अध्यक्ष
नरेंद्र कौंडिपुजला - उपशाखा अध्यक्ष
प्रविण पाटील- उपशाखा अध्यक्ष
रोहित गोडीया-उपशाखा अध्यक्ष
अजय कताळे- उपशाखा अध्यक्ष
दत्ताप्रसाद देसाई -उपशाखा अध्यक्ष
आकाश आवळेकर- मनविसे उपविभाग अध्यक्ष
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 9:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईत मनसेला मोठं भगदाड, पक्ष निर्मितीपासून साथ देणाऱ्या 11 जणांचा तडकाफडकी राजीनामा










