अजितदादा गेले, राष्ट्रवादीची सूत्रं पुन्हा जाणार पवार कुटुंबाकडे, आज घडणार मोठी घडामोड
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड आज होणार आहे.
प्रणाली कापसे, प्रतिनिधी मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड आज होणार आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. सुनेत्रा पवारांसह, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र आता अखेर पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. आज मुंबईतील वरळी येथील डोम येथे सायंकाळी ५ वाजता पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून, याच बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वरळीत रंगणार राजकीय सोहळा
आज सायंकाळी ५ वाजता वरळी येथील डोममध्ये राष्ट्रीय वर्किंग कमिटीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीचे मुख्य अजेंडा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड हा असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला जाईल. या प्रस्तावावर सूचक आणि अनुमोदक पद्धतीने सर्व संमतीने 'बिनविरोध' निवड केली जाणार आहे. त्यामुळे अजितदादांच्या निधनानंतर पुन्हा एकदा पवार कुटुंबाकडे राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रं येणार आहेत.
advertisement
असा असेल कार्यक्रम
राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या बैठकीत सुरुवातीला राष्ट्रीय अध्यक्ष निवडीचा ठराव मांडला जाईल. या ठरावाला उपस्थित सर्व सदस्यांकडून एकमताने अनुमोदन दिलं जाईल, ज्यामुळे सुनेत्रा पवार यांची निवड निर्विवाद ठरेल. यासाठी देशभरातून सुमारे ३५० राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीला पक्षाचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पक्षाचे सर्व आमदार, खासदार, माजी आमदार आणि माजी खासदार यांचा समावेश असेल. तसेच प्रदेश अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष आणि पक्षाचे अधिकृत प्रवक्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
advertisement
खरं तर, मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अजितदादांच्या निधनाने या चर्चांना ब्रेक बसला. सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांसारख्या बड्या नेत्यांनी विलीनीकरणाला विरोध केला. आता पक्षाची सूत्रं सुनेत्रा पवारांकडे आल्यास पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला वेग येण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 7:11 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादा गेले, राष्ट्रवादीची सूत्रं पुन्हा जाणार पवार कुटुंबाकडे, आज घडणार मोठी घडामोड







