Rahuri Bypoll: शेवटच्या क्षणाला माघार घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांची पोस्ट, भाजप नेत्यांचा उल्लेख करत म्हणाले....
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Rahuri Bypoll Election: गोविंद मोकाटे हे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि माजी पंचायत समिती सदस्य असून स्थानिक राजकारणात त्यांचा प्रभाव मानला जातो. राहुरी पोटनिवडणुकीसाठी त्यांनी आज राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केला.
राहुरी (अहिल्यानगर) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. महायुतीकडून अक्षय कर्डिले आणि महाविकास आघाडीकडून गोविंद मोकाटे हे उमेदवार मैदानात उतरल्याने निवडणूक चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र असलेल्या अक्षय कर्डिले यांच्या अर्ज भरण्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, अर्ज भरण्यापूर्वी रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयाला भेट दिली. जवळपास वीस मिनिटे बंद दरवाजाआड चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. या भेटीत स्थानिक प्रश्नांसह राजकीय समीकरणांवरही चर्चा झाल्याची माहिती समोर येते. त्यांच्या भेटीनंतर तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत.
महाविकास आघाडीकडून प्राजक्त तनपुरे हे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र त्यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने राष्ट्रवादीने गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली. त्यांनी माघार घेतल्यानंतर फेसबुक पोस्ट करून त्यांची भूमिका स्पष्ट केली.
प्राजक्त तनपुरे काय म्हणाले?
आपल्या राहुरी तालुक्याचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्याचा ध्यास मनात ठेवून मी या विधानसभा पोटनिवडणुकीकडे पाहत होतो. याच जाणिवेतून राहुरीच्या विकासासाठी, इथल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, युवकांच्या स्वप्नांसाठी, आणि महिलांच्या सन्मानासाठी मी ही पोटनिवडणूक लढविण्याचा निर्धार केला होता. परंतु, आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी माझी भेट घेतली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनीही ही पोटनिवडणूक न लढविण्याची विनंती केली.
advertisement
या चर्चेदरम्यान मी त्यांच्यासमोर राहुरीच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले. राहुरीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या मागण्या स्पष्टपणे मांडल्या आणि मला समाधान आहे की त्या सर्व मुद्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्या मान्य केल्या. जरी आपल्या राहुरीचा आमदार दुसऱ्या तालुक्यातील होणार असला, तरी राहुरीच्या विकासात कोणतीही तडजोड होणार नाही, असा ठाम विश्वास आणि आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यांच्या या विनंतीचा मान राखत आणि स्व. शिवाजीराव कर्डिले यांना आदरांजली अर्पण करत मी ही राहुरी विधानसभा पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय घेत आहे. हा निर्णय माझ्यासाठी सोपा नाही. पण हा निर्णय म्हणजे आपली लढाई थांबली असा अजिबात अर्थ नाही. आपण दोन पावले मागे घेतली आहेत. पण आता त्यानंतर चार पावले पुढे जाण्याची तयारी आहे. राहुरीच्या विकासाची, आपल्या हक्काची ही लढाई अशीच सुरू राहील अधिक ताकदीने, अधिक निर्धाराने.
advertisement
या संपूर्ण प्रवासात माझे कुटुंबीय, हितचिंतक आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे आपण सर्व कार्यकर्ते ज्या ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात, त्या प्रत्येकाचा मी मनापासून ऋणी आहे. तुमचा विश्वास, तुमचं प्रेम, आणि तुमची साथ हीच माझी खरी ताकद आहे. यापुढील काळात देखील आपण असेच प्रेम द्याल व माझ्या पाठीशी उभे रहाल हा विश्वास आहे, असे तनपुरे म्हणाले.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 7:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rahuri Bypoll: शेवटच्या क्षणाला माघार घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांची पोस्ट, भाजप नेत्यांचा उल्लेख करत म्हणाले....







