Rohit Pawar: डीसीपींना कोणाचा फोन आला? एफआयआर नोंदवताना पोलीस ठाण्यात काय झालं? रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Rohit Pawar: अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी आज मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात प्रचंड राडा पाहायला मिळाला.रोहित पवारांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. "डीसीपींना (DCP) कोणाचा फोन आला आणि त्यांनी प्रक्रिया थांबवली?" असा थेट सवाल त्यांनी विचारला आहे.
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी आज मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात प्रचंड राडा पाहायला मिळाला. आमदार रोहित पवार आणि त्यांचे सहकारी आक्रमकपणे एफआयआर (FIR) दाखल करण्यासाठी पोहोचले होते, मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी शेवटच्या क्षणी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने रोहित पवारांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. "डीसीपींना (DCP) कोणाचा फोन आला आणि त्यांनी प्रक्रिया थांबवली?" असा थेट सवाल त्यांनी विचारला आहे.
डीजीसीएवर (DGCA) संशयाची सुई
माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, "या अपघातात डीजीसीएचा हस्तक्षेप स्पष्टपणे दिसत आहे. त्यांनी २५ पैकी केवळ ५ विमाने बंद करून कारवाईचा दिखावा केला आहे. आमच्याकडे नवीन कायद्याचे पुस्तक आहे, ज्यातील नियमांचे उल्लंघन झाले आहे. पोलीस कर्मचारी जाधव, माळी, अटेंडर आणि पायलट या सर्वांचा मृत्यू झाला आहे, ही घटना सर्वांना माहीत असताना पोलीस टाळाटाळ का करत आहेत?", असा सवाल त्यांनी केला.
advertisement
पोलीस ठाण्यातील तो थरार
रोहित पवार यांनी पोलीस ठाण्यातील घटनाक्रम सांगताना सांगितले की, आमचे वकील प्रांजळ यांनी पोलिसांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली. त्यानंतर लॅपटॉप आणला गेला आणि माझे स्टेटमेंट लिहिण्यास सुरुवातही झाली होती. जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच डीसीपी आले आणि त्यांनी एफआयआर घेण्यास स्पष्ट नकार दिला असल्याचे रोहित पवारांनी सांगितले.
advertisement
"अधिकार कोणी हिरावला?"
रोहित पवार यांनी अत्यंत संतप्तपणे विचारले की, "एफआयआर दाखल करणे हा आमचा घटनादत्त अधिकार आहे. पोलीस आम्हाला आमचा अधिकार का वापरू देत नाहीत? कोणाच्या दबावाखाली ही कारवाई थांबवण्यात आली आहे? आम्ही आज इथे हक्कासाठी आलो होतो, अजितदादांना न्याय मिळत नाही. तिथे सामान्यांचे काय होत असेल असा सवाल त्यांनी केला.
advertisement
शर्ट काढला तरी एफआयआर, मग अपघाताचा एफआयआर का नाही?
रोहित पवारांनी पुढे म्हटले की, मराठी माणूस होता. आमचा माणूस होता म्हणून FIR घेतले नाही का? असा सवाल करताना दिल्लीत काँग्रेसने शर्ट काढले तर FIR घेतला, अपघात झाला तर FIR होतो. मग आमचा उपमुख्यमंत्री गेला आहे अपघातात, त्याचा FIR का नाही? असा हताश सवाल त्यांनी केला.उद्या सकाळी १० वाजता बारामती येथे जाऊन दादा यांनी बांधलेल्या इमारतीत जाऊन FIR दाखल करणार असून तिथे तरी एफआयआर दाखल होतोय का हे पाहणार असल्याचे रोहित पवारांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 25, 2026 2:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rohit Pawar: डीसीपींना कोणाचा फोन आला? एफआयआर नोंदवताना पोलीस ठाण्यात काय झालं? रोहित पवारांचा खळबळजनक आरोप








