भाजप-ठाकरे युती कधी होणार? चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंमधील संवाद लीक, नेमकं काय घडलं?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Mumbai News: ठाकरे गट आणि भाजपची पुन्हा युती होणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील संवादामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यात ठाकरे गट आणि भाजपची पुन्हा युती होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे आणि भाजपमधील जवळीक देखील वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली होती. 'एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन', अशी भूमिका ठाकरेंनी घेतली होती. पण आता चित्र बदलताना दिसत आहे. अलीकडेच हिवाळी अधिवेशानादरम्यान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली होती. मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल ठाकरेंनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या होत्या. या घटनेनंतर राज्यात लवकरच भाजप-ठाकरेंची युती होईल, असं बोललं जात होतं.
आता भाजप-ठाकरे युतीचा दुसरा अंक समोर आला आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यातला एक संवाद समोर आला आहे. ज्यात हे तिन्ही नेते भाजप- ठाकरे युतीबाबत चर्चा करताना दिसत आहेत. या संवाद समोर आल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात भाजप-ठाकरे गट युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. लवकरच हे दोन्ही पक्ष एकत्र येतील असं बोललं जातंय.
advertisement
नेमकं काय घडलं?
खरं तर, भाजपचे आमदार पराग अळवणी यांच्या मुलीचं मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये लग्न पार पडलं. या लग्न सोहळ्याला राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या लग्नाला उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि विनायक राऊत अशा ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील हजेरी लावली होती. लग्नसमारंभात असे भाजप-ठाकरे गटाचे नेते एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. या वेळी उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि चंद्रकांत पाटील यांच्यात काहीवेळ संवाद देखील रंगला.
advertisement
लग्न समारंभात गप्पा मारताना मिलिंद नार्वेकर यांनी हसता हसता 'युती कधी होणार?' असा सवाल चंद्रकांत पाटील यांना विचारला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनीही मिश्किल उत्तर दिलं. मीही त्याच सुवर्ण क्षणाची वाट पाहत आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यानंतर दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. दोघं हसू लागले. दोघांना हसताना पाहून उद्धव ठाकरे यांनी 'अरे काय कुजबूज करताय' असं विचारलं. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, 'मीच हेच म्हणत होतो की, युती होईल तो माझ्यासाठी सुवर्ण क्षण असेल!' उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातला हा संवाद समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. लवकरच हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, असं बोललं जातंय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 30, 2025 7:06 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजप-ठाकरे युती कधी होणार? चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंमधील संवाद लीक, नेमकं काय घडलं?