कपडे जाळले, डोक्यात रॉड घातला, जिवंतपणीच दरीत फेकलं? शेतकरी खंडणी प्रकरणात खळबळजनक खुलासा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
जालना जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील शेतकरी तुकाराम माधवराव गव्हाणे पाटील यांच्या अपहरणाचं गूढ उकललं आहे. याबाबत आता धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
जालना जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील शेतकरी तुकाराम माधवराव गव्हाणे पाटील यांच्या अपहरणाचं गूढ उकललं आहे. त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. आरोपींनी गव्हाणे यांचं अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केली आणि त्यानंतर कन्नड येथील औट्रम घाटातील दीडशे फूट खोल दरीत फेकून दिले. या घटनेमुळे संपूर्ण सिल्लोड आणि कन्नड तालुक्यात खळबळ उडाली आहे. पण ज्यावेळी आरोपींनी गव्हाणे यांना दरीत फेकलं, तेव्हा ते जिवंत असावेत, अशी माहिती आता समोर आली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, २६ डिसेंबर रोजी सायंकाळी उशिरा तुकाराम गव्हाणे यांचे अपहरण करण्यात आलं होतं. आरोपींनी त्यांचं एका कारमधून अपहरण करून छत्रपती संभाजीनगर शहर आणि त्यानंतर समृद्धी महामार्गावर फिरवले. प्रवासादरम्यान आरोपींनी गव्हाणे यांना लोखंडी रॉडने अमानुषपणे मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी नियोजित कट रचून ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.
advertisement
शवविच्छेदन अहवालातील धक्कादायक वास्तव
कन्नड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम पुंगळे व कर्मचारी विजयसिंग चाँदसिंग यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. या अहवालातून हत्येचा क्रूरपणा स्पष्ट झाला आहे. गव्हाणे यांच्या कपाळावर लोखंडी रॉडने जोरदार प्रहार करण्यात आला होता, ज्यामुळे २ इंच खोल गंभीर जखम झाली होती. त्यांच्या डाव्या पायावरही रॉडने वार करण्यात आल्याने मोठी जखम झाली होती. मारहाणीमुळे डोक्यापासून पायापर्यंत शरीराच्या अनेक भागांतून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता.
advertisement
याशिवाय आरोपींनी त्यांना घाटातील दरीत फेकून दिल्याने शरीरावर अनेक ठिकाणी खरचटल्याच्या आणि गंभीर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. याशिवाय ज्यावेळी आरोपींनी गव्हाणे यांना दरीत फेकलं, त्यावेळी गव्हाणे हे जिवंत असावेत, असा अंदाज आता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी व्हिसेरा तपासासाठी पाठवला आहे. तसेच आरोपींनी हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी गव्हाणे यांचा फोन आणि त्यांचे कपडे जाळून टाकल्याची देखील माहिती समोर आली आहे.
advertisement
या प्रकरणाचा तपास पोलीस वेगाने करत आहेत. हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसले तरी, जुना वाद किंवा आर्थिक व्यवहारातून ही घटना घडली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 7:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कपडे जाळले, डोक्यात रॉड घातला, जिवंतपणीच दरीत फेकलं? शेतकरी खंडणी प्रकरणात खळबळजनक खुलासा










