2 शत्रू टोळ्या, दोघांचं टार्गेट एकच.., 3 कारणांमुळे वनराज आंदेकरची हत्या, पोलिसांकडून 1700 पानी आरोपपत्र, खळबळजनक खुलासे
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची दोन वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी १७०० पानी दोषारोपपत्र दाखल केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची दोन वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. सोमनाथ गायकवाड आणि आंदेकरांचे जावई गणेश कोमकर टोळीने पाच ते सहा राऊंड फायरींग आणि कोयत्याने वार करून वनराज आंदेकरची हत्या केली होती. ही हत्या नेमकी कशामुळे केली? वनराजची बहीणच जीवावर का उठली? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आता अखेर पुणे पोलिसांनी वनराज आंदेकर खून प्रकरणी कोर्टात दोषारोप पत्र दाखल केलं आहे. १७०० पानांच्या दोषारोप पत्रात अनेक खळबळजनक खुलासे केले आहे. दोन शत्रू टोळ्या एकत्र आल्या, त्यांच्या टार्गेटवर वनराज आंदेकर का होते? कोणत्या तीन कारणांमुळे वनराजची हत्या झाली? याचा सविस्तर खुलासा दोषारोपपत्रात करण्यात आला आहे.
२१ आरोपींविरोधात १७०० पानांचे आरोपपत्र
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी वनराज आंदेकर खून प्रकरणात तब्बल १७०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये वनराज आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर, जावई जयंत कोमकर, गणेश कोमकर, प्रकाश कोमकर, आणि कुख्यात टोळीप्रमुख सोमनाथ गायकवाड यांच्यासह एकूण २१ जणांचा समावेश आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी न्यायालयासमोर पुराव्यांची सविस्तर मांडणी केली.
advertisement
सरकारी वकिलांनी घटनेवेळचे आणि आरोपी फरार होतानाचे CCTV फुटेज, ३९ प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, आरोपींचे मोबाईल कॉल डिटेल्स (CDR) आणि आवाजाचे नमुने, जप्त केलेली ८ पिस्तुले, ७ कोयते आणि १३ जिवंत काडतुसे असे भक्कम पुरावे कोर्टात सादर केले.
वनराज आंदेकरची हत्या का झाली?
सरकारी वकिलांच्या युक्तिवादानुसार, या हत्येमागे तीन प्रमुख कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे कौटुंबिक वाद. वनराज आंदेकर आणि त्यांची बहीण संजीवनी तसेच जावई कोमकर यांच्यात प्रदीर्घ काळापासून संपत्तीवरून वाद सुरू होते. दुसरं कारण म्हणजे अतिक्रमण कारवाईचा राग. वनराजची हत्या होण्याच्या काही दिवस आधी पुणे महापालिकेने संजीवनी कोमकर यांच्या नाना पेठेतील दुकानावर अतिक्रमणविरोधी कारवाई केली होती. त्यांचं दुकान पाडण्यात आलं होतं. ही कारवाई वनराज यांच्या सांगण्यावरूनच झाल्याचा संशय आरोपींना होता. तिसरं कारण म्हणजे निखील आखाडे खून प्रकरण. निखील आखाडे हा सोमनाथ गायकवाड टोळीचा सदस्य होता. त्याची हत्या केल्याचा आरोप आंदेकर टोळीवर होता. या प्रकरणी बंडू आंदेकरसह अन्य साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली होती. मात्र नंतर वनराज आंदेकर यांच्या राजकीय वजनामुळेच आंदेकर टोळीतील आरोपींना जामीन मिळाला होता. याचा राग सोम्या गायकवाडला होता.
advertisement
याच तीन कारणातून गायकवाड आणि कोमकर टोळी एकत्र आली. दोन्ही टोळ्यांनी मिळून वनराजची हत्या करण्याचं ठरवलं. घटनेच्या दिवशी १ सप्टेंबर २०२४ रोजी आरोपींनी नाना पेठेतील वीज पुरवठा मुद्दाम खंडित केला होता. त्यानंतर आरोपींनी वनराज यांच्यावर पाळत ठेवून आधी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्याने वार करून त्यांचा निर्घृण खून केला. यापूर्वीही दोन वेळा त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, असं तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणातील तपास अधिकारी आणि बचाव पक्षाचे वकील उपस्थित नसल्यामुळे आरोपनिश्चितीची उर्वरित प्रक्रिया पुढील सुनावणीच्या तारखेला पार पडणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष खटल्याच्या सुनावणीला सुरुवात होईल.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 8:42 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
2 शत्रू टोळ्या, दोघांचं टार्गेट एकच.., 3 कारणांमुळे वनराज आंदेकरची हत्या, पोलिसांकडून 1700 पानी आरोपपत्र, खळबळजनक खुलासे









