परतीच्या प्रवासाचा खोळंबा होणार, मुंबईत लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द, शेवटच्या गाडीची वेळ बदलली!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Mega Block: या ब्लॉकचा सर्वाधिक परिणाम सीएसएमटी, कुर्ला आणि ठाणे दरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्यांवर होणार आहे.
मुंबई: रात्री उशिरा लोकलने घरी परतणाऱ्या प्रवाशांसाठी पुढील काही दिवस प्रवास अधिक कठीण होणार आहे. प्रभादेवी येथील उड्डाणपुलाच्या पाडकामामुळे मध्य रेल्वेवर रात्रीच्या वेळेत ब्लॉक घेतले जात असून त्यामुळे अनेक लोकल गाड्या उशिरा धावणार, काही रद्द होणार तर काहींचे मार्ग बदलले जाणार आहेत. याचा थेट परिणाम नोकरदार आणि नियमित प्रवाशांवर होणार आहे. हा बदल नेमका केव्हापासून आणि किती वाजता असेल, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
वरळी-शिवडी कनेक्टर प्रकल्पाचा भाग असलेला हा ब्रिटिशकालीन पूल पाडून त्याजागी नवीन डबलडेकर पूल उभारण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यांनी केले आहे. या कामाची जबाबदारी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल) यांच्याकडे आहे.
ब्लॉक केव्हापासून सुरू?
या पाडकामासाठी सोमवारपासून मध्य रेल्वेवर दररोज रात्री ब्लॉक घेतला जात आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री 11:40 ते पहाटे 3:40 या वेळेत सुमारे चार तासांचा ब्लॉक असणार आहे. या काळात अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील काही गाड्या पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. शनिवारी मात्र मध्यरात्रीनंतर सलग सहा तासांचा मोठा ब्लॉक घेऊन उर्वरित काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
advertisement
लोकल फेऱ्यांमध्ये बदल आणि रद्द
या ब्लॉकचा सर्वाधिक परिणाम सीएसएमटी, कुर्ला आणि ठाणे दरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्यांवर होणार आहे. काही लोकल गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहेत, तर काहींचे मार्ग बदलण्यात येणार आहेत. कल्याण, कसारा आणि खोपोलीकडून येणाऱ्या काही गाड्या कुर्ला, ठाणे किंवा दादरपर्यंतच धावतील. काही गाड्या सीएसएमटीऐवजी दादर स्थानकातून चालवण्यात येणार आहेत.
advertisement
याशिवाय, शेवटच्या लोकलच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे, त्यामुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. काही मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांवरही या कामाचा परिणाम होण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.
सध्या उन्हाचा तडाखा वाढलेला असताना मध्य रेल्वेवरील लोकल गाड्या आधीच उशिराने धावत आहेत. त्यामुळे कामावर जाणाऱ्या आणि घरी परतणाऱ्या नोकरदारांची कसरत वाढली आहे. त्यातच आता या ब्लॉकमुळे संध्याकाळी आणि रात्रीच्या प्रवासात आणखी विलंब होणार असल्याने प्रवाशांची गैरसोय वाढणार आहे. पुढील काही दिवस प्रवाशांनी अधिक वेळ हातात ठेवून प्रवास करावा लागणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 31, 2026 10:45 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
परतीच्या प्रवासाचा खोळंबा होणार, मुंबईत लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द, शेवटच्या गाडीची वेळ बदलली!









