जमिनीच्या तुकड्यासाठी माणुसकीचा अंत? 3 दिवस शेतऱ्याचा मृतदेह फ्रीजमध्ये; पंचायतीचा 'तो' अजब निर्णय ऐकून संताप येईल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जमिनीचा ताबा मिळेपर्यंत बापाचा मृतदेह जमिनीत गाडायचा नाही, असा अजब आणि क्रूर निर्णय जेव्हा घेतला जातो, तेव्हा माणुसकी शिल्लक आहे का? असा प्रश्न पडतो.
मुंबई : "माणूस गेला की त्याचं नातं संपतं, मागे उरतात फक्त आठवणी..." असं आपण नेहमी म्हणतो. कोणत्याही समाजात मृत व्यक्तीला सन्मानाने अंतिम निरोप देणं हे सर्वात मोठं पुण्य मानलं जातं. पण बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात जे घडलं, ते ऐकून तुमचं काळीज पिळवटून निघेल. एका बाजूला मृतदेह अंतिम संस्काराची वाट पाहत होता, तर दुसऱ्या बाजूला रक्ताच्या नात्यात आणि गावच्या पंचायतीमध्ये जमिनीच्या व्यवहाराचा खेळ सुरू होता.
जमिनीचा ताबा मिळेपर्यंत बापाचा मृतदेह जमिनीत गाडायचा नाही, असा अजब आणि क्रूर निर्णय जेव्हा घेतला जातो, तेव्हा माणुसकी शिल्लक आहे का? असा प्रश्न पडतो.
नेमकी घटना काय?
ही घटना 20 जानेवारी रोजी सीतामढीच्या सुरसंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलाही गावात घडली. 55 वर्षांचे शेतकरी नईम अन्सारी आपल्या शेतात गव्हाच्या पिकाला पाणी देत होते. त्याचवेळी शेजारच्या शेतातील पिकांचे गुरांपासून संरक्षण करण्यासाठी लावलेल्या उघड्या वीज प्रवाहाच्या तारांचा त्यांना स्पर्श झाला आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
नईम यांच्या मृत्यूनंतर गावात पंचायत बसली. ज्यांच्या शेतात वीजप्रवाह सोडला होता, ते शेतकरी रत्नेश सिंह यांच्यावर मृतकाच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याचे ठरले. पंचायतीने निर्णय दिला की, रत्नेश सिंह यांनी मृताच्या वारसांना 4 कट्ठा जमीन द्यावी. दोन्ही बाजू सहमत झाल्या, पण इथेच माणुसकीचा अंत झाला.
अट अशी ठेवण्यात आली की, जोपर्यंत या जमिनीची अधिकृत 'रजिस्ट्री' (नोंदणी) मृताच्या कुटुंबाच्या नावावर होत नाही, तोपर्यंत नईम अन्सारी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत. हा अजब निर्णय मान्य करण्यात आला आणि सुरसंडवरून एक मोठा फ्रीझर मागवण्यात आला. ज्या मातीत नईम आयुष्यभर राबले, त्याच मातीत जाण्यासाठी त्यांना 3 दिवस एका थंड पेटीत वाट पाहावी लागली.
advertisement
22 जानेवारी रोजी परिहार निबंधक कार्यालयात जमिनीची नोंदणी पूर्ण झाली. अधिकृत कागदपत्रं हातामध्ये पडताच, नईम अन्सारी यांचा मृतदेह फ्रीझरमधून बाहेर काढण्यात आला आणि त्यानंतरच त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. दरम्यान, काही गावकऱ्यांनी असा दावा केला की, मृताची मुले बाहेरगावी होती म्हणून मृतदेह ठेवला होता, पण जमिनीच्या व्यवहारामुळेच हा उशीर झाल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
advertisement
पोलिसांची भूमिका आणि पेच
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही पक्षांनी 'आमच्यात आपापसात समझोता झाला आहे' असे सांगून कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिला. कोणतीही लेखी तक्रार न मिळाल्याने पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
नुकसानभरपाई मिळणं हा कुटुंबाचा हक्क असू शकतो, पण एका मृतदेहाला ओलीस धरून जमिनीचा व्यवहार करणं, हे कोणत्या संस्कृतीत बसतं? ३ दिवस फ्रीझरमध्ये ठेवलेला तो मृतदेह जणू समाजाच्या निर्दयी मानसिकतेचा आरसा दाखवत होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 5:54 PM IST
मराठी बातम्या/देश/
जमिनीच्या तुकड्यासाठी माणुसकीचा अंत? 3 दिवस शेतऱ्याचा मृतदेह फ्रीजमध्ये; पंचायतीचा 'तो' अजब निर्णय ऐकून संताप येईल







