Ambedkar Jayanti : बाबासाहेब आंबेडकरांचे कुटुंब कसे होते? त्यांच्या मुलांनी पुढे काय केलं?
- Published by:Rahul Punde
- trending desk
Last Updated:
14 एप्रिल हा डॉ. भीमराव (बाबासाहेब) आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे. या दिवशी देशभरात त्यांचा जयंती उत्सव साजरा केला जातो. डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या कुटुंबातल्या नंतरच्या पिढ्यांनी आपापल्या परीने भारतीय राजकारणावर प्रभाव टाकला. बाबासाहेबांचे वंशज काय करतात, याबाबत माहिती घेऊ या.
1) भारतीय राजकारणावर मोठा प्रभाव टाकणारे आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची चौथी पिढी राजकारणामध्ये येऊ बघत आहे. त्यांच्या कुटुंबातले काही सदस्य सामाजिक कार्यकर्ते आहेत, तर काही जण दलित चळवळ बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात गांधी किंवा नेहरू ही आडनावं जितकी प्रसिद्ध आहेत, तितकीच प्रसिद्धी आंबेडकर या आडनावालादेखील आहे.
advertisement
2) या फोटोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपली पहिली पत्नी रमाबाई आणि मोठा मुलगा यशवंत (डावीकडे) यांच्यासोबत दिसत आहेत. उजवीकडे त्यांचा मोठा भाऊ आनंद यांची पत्नी आहे. आंबेडकरांना पाच मुलं होती; पण यशवंत वगळता इतर चौघे बालपणीच मरण पावले. रमाबाई नऊ वर्षांच्या आणि बाबासाहेब 15 वर्षांचे असताना त्यांचं लग्न झालं होतं. रमाबाईंचं वयाच्या 37व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं. आंबेडकरांची प्रगती आणि उच्च शिक्षणासाठी रमाबाईंचं फार मोठं योगदान आणि समर्पण होतं.
advertisement
3) डॉ. आंबेडकरांनीदेखील 'थॉट्स ऑन पाकिस्तान' या पुस्तकाद्वारे कुटुंबाप्रति रमाबाईंनी केलेला त्याग आणि समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. 1941मध्ये प्रकाशित झालेलं हे पुस्तक त्यांनी आपल्या पहिल्या पत्नी रमाबाईंना समर्पित केलं होतं. 1935मध्ये रमाबाईंचं निधन झालं तेव्हा बाबासाहेबांनी पुन्हा कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता.
advertisement
4) या बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी सविता आहेत. चाळीसच्या दशकात आंबेडकरांची तब्येत ढासळू लागली आणि त्यांचा डायबेटीस नियंत्रणाबाहेर गेला होता. त्याचा शरीरावर परिणाम होऊ लागला होता. तेव्हा मुंबईत डॉक्टर असलेल्या सविता यांनी आंबेडकरांना बरं केलं होतं. त्या ब्राह्मण कुटुंबातल्या होत्या. आंबेडकरांनी 1948मध्ये त्यांच्याशी दुसरं लग्न केलं. या लग्नाला आंबेडकर कुटुंबात विरोध झाला होता.
advertisement
5) आंबेडकरांनी एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत सविता यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांनी केलेल्या उपचारामुळे आपलं आयुष्य आठ ते 10 वर्षांनी वाढलं, असं आंबेडकर म्हणाले होते. 2003मध्ये सविता यांचा मुंबईत मृत्यू झाला. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये सविता सक्रिय सहभागी होत्या.
advertisement
6) हे यशवंत आंबेडकर आहेत. पाच भाऊ-बहिणींपैकी ते एकटेच जिवंत राहिले. त्यांनी वडिलांच्या मार्गावर वाटचाल केली. आंबेडकरी बौद्ध चळवळीलाही त्यांनी दीर्घ काळ बळ दिलं. ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष झाले होते. यशवंत एक वृत्तपत्र काढायचे. त्याचे ते मुख्य संपादक होते. त्यांनी दोन पुस्तकंही लिहिली आहेत. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्यही होते. राजकारणातही ते सक्रिय होते. 1977मध्ये त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेत 10 लाख जण उपस्थित होते. यावरून त्यांचा जनमानसावर किती प्रभाव होता, हे लक्षात येतं. यशवंत यांना तीन मुलं आणि एक मुलगी अशी एकूण चार अपत्यं झाली.
advertisement
7) प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांच्या तिसऱ्या पिढीतले सदस्य आहेत. प्रकाश हे यशवंत आंबेडकरांचे सर्वांत मोठे पुत्र आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. ते दलितांच्या चळवळीशी संबंधित आहेत. समाजसेवक म्हणूनही त्यांची ओळख आहे. ते भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी 2018मध्ये वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. ते दोन वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत आणि एकदा राज्यसभा सदस्यही झाले आहेत. प्रकाश यांनीदेखील अनेक पुस्तकं लिहिली आहेत.
advertisement
8) हे आनंदराज आंबेडकर आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ते दुसरे नातू आहेत. त्यांनी इंजिनीअरिंगची पदवी घेतलेली आहे; पण ते राजकारणात जास्त सक्रिय आहेत. त्यांनी रिपब्लिकन आर्मीची स्थापना केली. आनंदराज यांना साहिल आणि अमन ही दोन मुलं आहेत. यशवंतरावांचा तिसरा मुलगा भीमराव यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.
advertisement
9) डॉ. बी. आर. आंबेडकर यांची एकुलती एक नात आणि यशवंतराव यांची मुलगी रमा आनंद यांचा विवाह आनंद तेलतुंबडे यांच्याशी झाला. आनंद हे गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रोफेसर आहेत. अनेक वृत्तपत्रांमध्ये ते स्तंभलेखन करतात. इंजिनीअरिंग केल्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून मॅनेजमेंटचा कोर्स केला आणि त्यानंतर भारत पेट्रोलियममध्ये वरिष्ठ पदावर काम केलं. त्यानंतर ते शैक्षणिक क्षेत्राकडे वळले. देशातल्या जातिव्यवस्थेवर त्यांनी विपुल लिखाण केलं आहे. रमा आणि आनंद यांना प्राची व रश्मी या दोन मुली आहेत. त्या दोघीही दलित आणि वंचितांसाठी लिखाण करतात.
advertisement
10) प्रकाश यांचा मुलगा सुजात हा डॉ. आंबेडकरांच्या चौथ्या पिढीचं प्रतिनिधित्व करतो. सुजातसोबत त्याची अनेक चुलत भावंडंदेखील आहेत. 26 वर्षांचा सुजात सध्या ट्विटरवर खूप सक्रिय आहे. तो सार्वजनिक सभा घेतो. मोठा जनसमुदाय आकर्षित करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. त्याचे कुरळे केस त्याला वेगळा लुक देतात. सुमारे तीन वर्षांपूर्वी त्याने दलित आणि वंचितांसाठी एक वेबसाइट सुरू केली. फर्ग्युसन कॉलेजमधून पत्रकारितेची पदवी घेतली असली, तरी तो वडिलांना राजकारणात साथ देत आहे. कॉलेजमधल्या एका रॉक बँडचाही तो सदस्य होता.


