Weather Alert: वारं फिरलं! मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल, आज कुठं कोसळणार पाऊस?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. आज काही जिल्ह्यांत श्रावणसरी बरसण्याचा अंदाज आहे.
राज्यात मान्सूनचा जोर ओसरला असून मराठवाड्यात देखील हवा बदलली आहे. गेल्या 24 तासांपूर्वी हवामान विभागाने पाच जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' जारी केला होता. त्यामुळे मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार तर काही ठिकाणी दिवसभर संततधार पावसाने हजेरी लावली. आज हवामानात मोठे बदल जाणवत असून 27 जुलै रोजी विजांच्या कडकडाटात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.
advertisement
हवामानात बदल जाणवत असल्याने छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ढगांचा गडगडात राहणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस आणि ढगांचा गडगडाट राहील. तर बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
advertisement
मराठवाड्यात शनिवारी पाच जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला होता. छत्रपती संभाजीनगर, जालन्यासह काही जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस पडला. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग झाली असून नादरपूर गावात संततधार पावसामुळे अंजना नदीला मोठा पूर आला आहे. 26 जुलै रोजी दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे अंजना नदी दुथडी भरून वाहत असून, पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
advertisement
आठही जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने श्रावणाच्या पहिल्याच दिवशी सर्वत्र हजेरी लावली. तर श्रावणाच्या दुसऱ्या दिवशी देखील दिवसभर श्रावणसरी बरसल्या. त्यामुळे पाण्याअभावी कोमेजत असलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे पिके पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगरसह सर्व तालुक्यांमध्ये संततधार सुरू होती. तर, काही ठिकाणी दुपारच्या सुमारास दमदार पाऊस झाला.
advertisement
मराठवाड्यात पुढील काही दिवस पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा असणार आहे. त्यामुळे 8 पैकी कोणत्याच जिल्ह्याला 'सतर्कतेचा अलर्ट' राहणार नाही. या आठवडाभरात झालेल्या पावसामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी यासह काही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाल्यामुळे पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत.


