Weather Alert: 24 तासांत फिरलं वारं, महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल, 25 जानेवारीला नवा अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. रविवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
राज्यभरात आता हिवाळ्याचे दिवस संपत आल्याचे चित्र असून महाराष्ट्रातील हवामान हळूहळू बदलताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि वाढलेल्या तापमानामुळे थंडीचा जोर कमी झाला आहे. सकाळी आणि रात्री थोडासा गारवा जाणवत असला, तरी दिवसा उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे. 25 जानेवारी रोजीही राज्यातील बहुतांश भागांत असाच हवामानाचा अनुभव येण्याची शक्यता आहे.
advertisement
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर थंडीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. दिवसभर हवामान प्रामुख्याने स्वच्छ राहणार असून सकाळी व रात्री सौम्य गारवा जाणवेल. मात्र दुपारच्या वेळेत उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. मुंबई व आसपासच्या भागांत कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज असून किमान तापमान 18 ते 21 अंश सेल्सिअस राहील. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागांतही असाच हवामानाचा अनुभव येणार असून पावसाची शक्यता पूर्णतः नाही.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर परिसरात सकाळच्या वेळेत थोडी थंडी जाणवेल. काही ठिकाणी पहाटे हलकं धुकं पडण्याची शक्यता आहे. मात्र, सूर्य वर येताच तापमानात झपाट्याने वाढ होईल. दुपारी उन्हाचा चांगलाच तडाखा बसू शकतो. या भागात कमाल तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून किमान तापमान 14 ते 16 अंश सेल्सिअसदरम्यान राहील. ग्रामीण भागात रात्री थोडा गारवा जाणवू शकतो.
advertisement
मराठवाडा आणि विदर्भ विभागातही थंडीचा जोर आता कमी होत चालला आहे. छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव भागांत आकाश निरभ्र राहील आणि दिवसा ऊन तापण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 ते 17 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ भागांत सकाळी सौम्य गारवा जाणवेल, मात्र दुपारी तापमान वाढून उष्णता जाणवू शकते. येथे कमाल तापमान 30 ते 33 अंश आणि किमान तापमान 15 ते 18 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
advertisement
दरम्यान, 25 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार असून हिवाळा जवळपास संपत असल्याचे संकेत आहेत. सकाळी-रात्री थोडी थंडी आणि दिवसा वाढती उष्णता असा संमिश्र हवामानाचा अनुभव नागरिकांना येणार आहे. पुढील काही दिवस तापमानात फारसा बदल न होता उन्हाळ्याकडे वाटचाल सुरू राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.









