Pune News : वातावरण बदलांमुळे भात पिक धोक्यात; रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल
Last Updated:
Rrice Crop Loss: हवामानातील सतत बदल, अनियमित पाऊस आणि वाढलेले रोग यामुळे भात शेतकरी हवालदिल झाले आहेत. करपा रोगासह इतर पिकांवरील संकटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून भात उत्पादन धोक्यात आले आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगड तालुका भात पिकाचे आगर म्हणून ओळखला जातो.मात्र, याच तालुक्यातील पासली अठरागाव मावळ खोरे, तोरणा आणि राजगड परिसरातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. हातातोंडाशी आलेल्या उभ्या भात पिकावर करपा रोगासह इतर बुरशीजन्य रोगांचा जोरदार प्रादुर्भाव झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून, प्रशासनाकडून तातडीने मदतीची मागणी होत आहे.
या भागातील भोर्डी, वरोती, शेनवड, बालवड, पासली, केळद, हारपूड आदी गावांसह वाड्या-वस्त्यांमध्ये भात पिकाची सर्वाधिक दयनीय अवस्था झाली आहे. विशेषतहा रायगड जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या अठरागाव मावळ परिसरात रोगराईचे प्रमाण अधिक दिसून येत आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, 15 मे पासून सलग पडणारा पाऊस, दाट धुके आणि सततचे ढगाळ वातावरण यामुळे भात पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. योग्य ऊन न मिळाल्याने रोपांची वाढ खुंटली. गेल्या पंधरवड्यापासून करप्यासारख्या घातक रोगाने उभ्या पिकावर आघात केला. सुरुवातीला पानांवर डाग दिसून आले. नंतर संपूर्ण रोपे पिवळसर झाली आणि हळूहळू मुळापर्यंत पांढरी पडली.
advertisement
केळद गावचे सरपंच रमेश शिंदे यांनी सांगितले की,अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून मोठ्या कष्टाने भाताची लागवड केली.मात्र, पावसाने आणि रोगराईमुळे पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. या भागातील शेतकऱ्यांचा प्रमुख आधार हा केवळ भातशेतीवरच आहे. त्यामुळे आता त्यांच्या उपजीविकेवरच संकट आले आहे. भात पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. काही शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज फेडणे अशक्य झाले आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली असून मानसिक ताणतणाव देखील वाढला आहे.
advertisement
याबाबत नुकतेच राजगडचे तहसीलदार निवास ढाणे यांची भेट घेऊन सरपंच रमेश शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी आपली व्यथा मांडली. त्यांनी तातडीने भात पिकांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत, तसेच शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून कृषी विभागाने आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन द्यावे आणि नुकसानभरपाई देण्याबाबत शासनाने लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा शेतकऱ्यांचे जगणेच कठीण होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 12:55 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : वातावरण बदलांमुळे भात पिक धोक्यात; रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल