40 ते 45 फूट उंच, परंपरेने जातात डोंगरावर, जोतिबा यात्रेत सासनकाठ्यांचं महत्त्व काय? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
दरवर्षी चैत्र पौर्णिमा हस्त नक्षत्रावर जोतिबा यात्रेचा मुख्य दिवस असतो. दख्खनचा राजा जोतिबाच्या या पूर्वपार चालत आलेल्या परंपरेने आजही हजारो सासनकाठ्या जोतिबा डोंगरावर जातात.
कोल्हापूर : दरवर्षी चैत्र पौर्णिमा हस्त नक्षत्रावर जोतिबा यात्रेचा मुख्य दिवस असतो. यासाठी पहाटे पाच ते सहा वाजता श्री जोतिबाचा शासकीय महाअभिषेक होतो. सर्व विधी झाल्यानंतर सासनकाठ्यांची मिरवणूक सुरू होते. सासनकाठी म्हणजे नाथ केदाराचा विजय ध्वज. दख्खनचा राजा जोतिबाच्या या पूर्वपार चालत आलेल्या परंपरेने आजही हजारो सासनकाठ्या जोतिबा डोंगरावर जातात. माघ महिन्यात ज्योतिबाचे पाच खेटे मारून झाल्यानंतर चैत्र महिन्यात जोतिबाची यात्रा भरते. यावेळी मानाच्या सासनकाठ्या देखील येथे आलेल्या असतात. एकंदरीतच काय आहे यात्रेचं आणि या सासनकाठ्यांचं महत्त्व? याबद्दलचं मंदिर आणि शास्त्र अभ्यासक प्रसन्न मालेकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
सासनकाठी ही सुमारे 40 ते 45 फूट उंचीची जाड वेळुची (कळकाची) असते. हा कळक आणताना आणि निवडताना विशिष्ट प्रकारे पारख आणि पूजा विधी केला जातो. प्रत्येक सासनकाठीचं निशाण हे वेगवेगळे असतं. हस्त नक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ होतो, त्यावेळेस देवस्थान कमिटीचे भालदार चोपदार फक्त संत नावजीनाथांनाच किंवा काठीस पानाचा विडा देऊन आमंत्रण देतात आणि तोफेच्या सलामीने मिरवणुकीस प्रारंभ होतो.
advertisement
या मिरवणुकीमध्ये क्रमवारीने पहिला मान इनाम पाडळी (जि.सातारा) या सासनकाठीचा, त्यानंतर मौजे विहे (ता.पाटण), करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, वाळवा तालुक्यातील करंजवडे गावातून येणारी ग्वाल्हेरच्या शिंदे उर्फ सिंधिया सरकार, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता.मिरज), कसबा सांगाव (ता.कागल), किवळ (जि. सातारा), कवठेएकंद (जि. सांगली), रेठरे बुद्रुक साळुंखे (ता.कराड) यांच्या मानाच्या 18 शासनकाठ्या सहभागी होतात. मान नसलेल्या 57 आणि इतर 29 अशा एकूण 96 सासनकाठ्या सहभागी असतात.
advertisement
दरवर्षी अशी पार पडते यात्रा
view commentsचैत्र पौर्णिमे दिवशी देवाचा शासकीय महाभिषेक हा पहाटे 4 ते 6 या वेळेत केला जातो. त्यानंतर महावस्त्रासह महापूजा केली जाते. पुढे दुपारी 12 वाजण्याच्या आत धुपारती त्याचबरोबर पंचारती केली जाते. त्यानंतर सासनकाठ्यांची मिरवणूक दुपारी साधारण 1 वाजता सुरू होते. संध्याकाळी जोतिबा देवाची पालखी यमाई मंदिराकडे जाते. पुढे सुर्यास्तानंतर यमाई मंदिरासमोर सदरेवर देवाची पालखी विराजमान होते. यानंतर यमाई आणि जमदग्नी यांचा (पालखीतील कट्यार) प्रतिकात्मक विवाहसोहळा पार पडतो. सर्व विधी पार पडल्यानंतर देवाची पालखी परत येऊन सदरेवर विराजमान होते. त्यानंतर स्तोत्रयुक्त पदांचे गायन, सर्व मानकऱ्यांना पानविडा, तोफेची सलामी देऊन पालखी सोहळ्याची सांगता होते. तर या दिवशी रात्री जोतिबा देवाला विशेष महास्नानही घालण्यात येते, अशी माहिती प्रसन्न मालेकर यांनी सांगितली.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
April 11, 2025 6:15 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
40 ते 45 फूट उंच, परंपरेने जातात डोंगरावर, जोतिबा यात्रेत सासनकाठ्यांचं महत्त्व काय? Video

