सामना रंगात आला अन् मधमाशांनी हल्ला केला, क्रिकेटच्या मैदानात अंपायरचा मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
राहुल सप्रू स्टेडियममध्ये मधमाश्यांच्या हल्ल्यात कानपूरचे अंपायर मानिक गुप्ता यांचा मृत्यू, सुनील निषाद व काही लहान क्रिकेटपटू जखमी, प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप.
बुधवारची संध्याकाळ एक काळा दिवस ठरली. उन्नावच्या स्प्रू स्टेडियममध्ये अंडर- 13 क्रिकेट सामन्याचा थरार सुरू असताना, अचानक निसर्गाचा कोप झाला आणि अंपायरला आपला जीव गमवावा लागला. मधमाश्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात कानपूरचे प्रसिद्ध अंपायर मानिक गुप्ता यांचा मृत्यू झाला, तर दुसरा अंपायर आणि काही लहान क्रिकेटपटू या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
शुक्लागंज इथे राहुल सप्रू स्टेडियमवर एचए अकॅडमी आणि एसबीएस अकॅडमी यांच्यात १३ वर्षांखालील मुलांचा क्रिकेट सामना रंगला होता. खेळ ऐन रंगात असताना अचानक मधमाश्यांच्या एका मोठ्या थव्याने मैदानावर आक्रमण केलं. काही कळायच्या आत मधमाश्यांनी खेळाडू आणि अंपायरला डंख मारायला सुरुवात केली. मैदानावर उपस्थित असलेले माणिक गुप्ता मधमाश्यांच्या घेऱ्यात अडकले. शेकडो मधमाश्यांनी त्यांना एकाच वेळी डंख मारल्याने त्यांची प्रकृती खालावली.
advertisement
माणिक गुप्ता यांना तातडीने कानपूरमधील एका खासगी नर्सिंग होममध्ये नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने 'हॅलट' रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करताच क्रीडा विश्वात शोककळा पसरली. माणिक गुप्ता हे कानपूर क्रिकेट असोसिएशनशी गेल्या अनेक वर्षांपासून जोडलेले होते. त्यांच्या निधनाने क्रिकेट क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात सुनील निषाद हे दुसरे पंच आणि काही लहान मुलेही जखमी झाली आहेत, मात्र सुदैवाने त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
advertisement
प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर?
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेडियम परिसरात आधीच मधमाश्यांचे एक मोठे मोहोळ होते. या मोहोळाचा खेळाडूंना त्रास होऊ शकतो, याची कल्पना असतानाही प्रशासनाने ते हटवण्यासाठी कोणतीही पावले उचलली नव्हती. एका छोट्याशा हलगर्जीपणामुळे एका अनुभवी पंचाचा बळी गेल्याने आता क्रीडा प्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. जर वेळेत हे मोहोळ काढले असते, तर आज मानिक गुप्ता आपल्यामध्ये असते, अशी भावना व्यक्त होत आहे.
advertisement
मैदानावर शांतता आणि हळहळ
या घटनेनंतर क्रिकेट सामना तातडीने थांबवण्यात आला. मानिक गुप्ता यांच्या निधनाचे वृत्त समजताच खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. मैदानावर जिथे चौकार आणि षटकारांचा आवाज घुमत होता, तिथे आज केवळ शांतता आणि अश्रू पाहायला मिळत आहेत.
Location :
Madhya Pradesh
First Published :
Feb 19, 2026 12:54 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
सामना रंगात आला अन् मधमाशांनी हल्ला केला, क्रिकेटच्या मैदानात अंपायरचा मृत्यू







