Thane : पावसाळ्यात लोकलचा खोळंबा होणार नाही, ठाणे स्थानकात गेमचेंजर प्रकल्प, कर्जत-कसारा आणि पनवेलकरांना दिलासा
Last Updated:
Central Railway : रेल्वे प्रवाशांसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता पावसाळ्यात रेल्वे पाण्यात अडकणार नाही. नेमका असा कोणता प्रकल्प तयार केलेला आहे त्याबाबत जाणून घ्या.
ठाणे : पावसाळा सुरु होताच मुंबई लोकल ठप्प होण्याचे प्रकार होत असतात. मात्र येत्या वर्षी पावसाळ्यात लोकलचा खोळंबा होणार नसून त्यासाठी आता एक नवा प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्याचे कामही पूर्ण झालेले आहे.
रेल्वेचा कायमस्वरूपी तोडगा
ठाणे स्थानकात दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर आता कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. मध्य रेल्वेने ठाणे स्थानक परिसरात मायक्रोटनेलिंगचे काम यशस्वीपणे पूर्ण केले आहे. हे महामुंबईतील सर्वाधिक लांबीचे मायक्रोटनेल ठरले आहे.
प्रकल्पाचा कर्जत-पनवेलकरांना फायदा
ठाणे शहराच्या पश्चिम भागातून येणारे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात फलाट क्रमांक एक, दोन आणि तीनवर साचत होते. यामुळे रेल्वे रुळ पाण्याखाली जात असून सीएसएमटी आणि कल्याण दिशेने जाणारी लोकल सेवा वारंवार विस्कळीत होत होती. ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने फलाट क्रमांक एक ते दहा यांच्या खाली मायक्रोटनेल उभारण्याचा निर्णय घेतला.
advertisement
नवीन मायक्रोटनेल प्रणाली वापरात
या मायक्रोटनेलच्या माध्यमातून पश्चिमेकडील पावसाचे पाणी वेगाने पूर्वेकडे वळवले जाणार आहे. विशेष म्हणजे हे टनेल सुरु करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली असून केवळ एक बटण दाबताच पाण्याचा निचरा करता येणार आहे.
हे काम 1 डिसेंबर 2024 रोजी सुरू झाले असून अवघ्या 15 जानेवारी 2025 रोजी पूर्ण करण्यात आले. कठीण चिकणमाती आणि खडकाळ भूस्तरामुळे हे काम आव्हानात्मक होते. मात्र लेझर तंत्रज्ञान, हायड्रोलिक जॅक आणि अत्याधुनिक मायक्रोटनेल बोरिंग मशिन च्या मदतीने अत्यंत अचूकपणे पाइप जोडणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे यंदाच्या पावसाळ्यात ठाणे स्थानकातील लोकल सेवा व्यवस्थित सुरु राहील आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 9:40 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Thane : पावसाळ्यात लोकलचा खोळंबा होणार नाही, ठाणे स्थानकात गेमचेंजर प्रकल्प, कर्जत-कसारा आणि पनवेलकरांना दिलासा










