'पाणी पाजा रे...', नवरीच्या भावाची ग्रेट आयडिया, सोशल मीडियावर 'ही' लग्नपत्रिका ठरलीय चर्चेचा विषय!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
सिंपी कुमारीच्या लग्नपत्रिकेने लोकांचे लक्ष वेधले आहे. या पत्रिकेत उष्णतेत पक्ष्यांसाठी अन्न व पाणी ठेवण्याचा संदेश दिला आहे. सिंपीचा भाऊ रंजनकुमार मागील 9 वर्षांपासून पक्षी...
बिहारच्या गया जिल्ह्यात सध्या एका लग्नपत्रिकेची जोरदार चर्चा आहे. या पत्रिकेद्वारे असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की, ज्या कोणालाही ही पत्रिका मिळेल, त्यांनी या तीव्र उष्णतेत आपल्या घराच्या किंवा कार्यालयाच्या छतावर पक्ष्यांसाठी अन्न आणि पाण्याची सोय नक्की करावी.
खरं तर, जिल्ह्यातील कोंच प्रखंड परिसरातील बाली गावातील रहिवासी रामप्रवेश यादव यांची मुलगी सिम्पी कुमारी हिचं लग्न 11 मे रोजी आहे. लग्नाच्या पत्रिका छापण्याची तयारी सुरू होती. तेव्हा सिम्पीचा भाऊ रंजन कुमार याला लग्नपत्रिकेवर काहीतरी वेगळं करण्याची कल्पना आली, जेणेकरून लोकांपर्यंत एक खास संदेश पोहोचवता येईल.
9 वर्षांपासून पक्षी वाचवण्यासाठी प्रयत्न
रंजन कुमार हा पक्षीप्रेमी आहे आणि गेल्या 9 वर्षांपासून तो डोंगरावर किंवा घराच्या आसपास पक्ष्यांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करत आहे. ऊन असो वा पाऊस, रंजन दररोज आपले दोन तास पक्ष्यांसाठी देतो. सध्या संपूर्ण बिहार उष्णतेच्या तडाख्यात आहे, त्यामुळे पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी गया शहरातील रामशिला डोंगरावर या तीव्र उष्णतेत 100 हून अधिक टिनचे भांडे टांगण्यात आले आहेत, ज्यात पक्ष्यांना अन्न आणि पाणी दिले जाते. हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने, लग्नपत्रिकेद्वारे पक्ष्यांना वाचवण्याचा आणि त्यांच्यासाठी अन्नपाण्याची व्यवस्था करण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
advertisement
विलुप्त होणाऱ्या पक्ष्यांना वाचवण्यासाठी लोकांनी पुढे यावे
रंजन कुमारने 'लोकल 18' ला सांगितले की, त्याच्या धाकट्या बहीणचं लग्न 11 मे रोजी आहे. लग्नपत्रिकेद्वारे पक्ष्यांचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला आहे, जेणेकरून पक्ष्यांना विलुप्त होण्यापासून वाचवता येईल. आजच्या काळात अनेक पक्षी विलुप्त झाले आहेत. या तीव्र उष्णतेत अन्नापाण्याच्या कमतरतेमुळे एकाही पक्ष्याचा मृत्यू होऊ नये, यासाठी लोकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी या उन्हाळ्यात आपल्या घराच्या किंवा कार्यालयाच्या छतावर पक्ष्यांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करावी, कारण जर पक्षी असतील तरच माणूस असेल. आपण सर्व एकमेकांवर अवलंबून आहोत.
advertisement
लग्नपत्रिकेद्वारे पक्षी वाचवण्याचं आवाहन
रंजन लग्नपत्रिकेवर असे संदेश देण्यामागचं कारण स्पष्ट करतो की, तो गेल्या 9 वर्षांपासून पक्ष्यांच्या संरक्षणासाठी काम करत आहे. उन्हाळ्यात अन्नापाण्याच्या कमतरतेमुळे लहान पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये, यासाठी पत्रिकेवर असे संदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त लोक या अभियानात सामील होतील आणि पक्ष्यांना वाचवण्यासाठी काम करतील. त्याने सांगितले की अनेक लोकांनी या अभियानाला पाठिंबा दिला आहे आणि लोक त्याचं कौतुकही करत आहेत. मात्र, काही लोक यावर टीकाही करतात. पण, आमचा विचार असा आहे की, जर पक्षी असतील, तरच आपण आहोत. याच विचाराने आम्ही लग्नपत्रिकेद्वारे हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत. यात आम्हाला घरातील सगळ्या लोकांचा पाठिंबा मिळत आहे.
advertisement
हे ही वाचा : शेतजमीन नाही, गुरंढोरं नाहीत, तरीही 'ही' व्यक्ती बनली लखपती, दिलं डझनभर लोकांना काम, असा कोणता व्यवसाय केला?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 01, 2025 1:41 PM IST
मराठी बातम्या/Viral/
'पाणी पाजा रे...', नवरीच्या भावाची ग्रेट आयडिया, सोशल मीडियावर 'ही' लग्नपत्रिका ठरलीय चर्चेचा विषय!