कृषी हवामान :आज पुन्हा आभाळ फाटणार! पीकं भुईसपाट, IMD कडून या जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत असून हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक आणि पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी केला आहे. सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरणासह मुसळधार पाऊस सुरू आहे.
मुंबई : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत असून हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक आणि पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी केला आहे. सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरणासह मुसळधार पाऊस सुरू आहे. उपनगरांत मध्यरात्रीपासून पाऊस सुरू असून, लोकल व रस्ते वाहतूक सध्या सुरळीत आहे. मात्र, दुपारनंतर अतिवृष्टी झाल्यास सखल भागात पाणी साचण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे डोंगरी व तितुर नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. काढणीवर आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. धाराशिव जिल्ह्यात तेरणा नदीला पूर आल्याने प्रशासनाने सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट असून घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग सुरू असून, नाशिकमधील गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे आणि नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
राज्यातील पावसाची स्थिती
रविवार, २८ सप्टेंबर रोजी सकाळी आठपर्यंत राज्यातील तब्बल ५४८ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. नद्या-ओढ्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून हतबलता वाढली आहे. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नांदेड, लातूर, नाशिक, सोलापूर, पुणे, रायगड आणि मुंबईसह अनेक जिल्हे पुराच्या मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत.
advertisement
जायकवाडी, उजनी, कोयना, गंगापूर, बिंदुसरा, येलदरी, गोसेखुर्द, बेंबळा, धामणी, निम्नदुधना, खडकवासला व भातसा यांसारख्या महत्त्वाच्या धरणांचे दरवाजे उघडले आहेत. गोदावरी आणि सीना नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, पाणीपातळी वाढल्याने नदीकाठची गावे धोक्यात आहेत.
शेतीचे मोठे नुकसान
मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कपाशी, झेंडू, मूग, ऊस, मका, बाजरी आणि कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरांमध्ये पाणी शिरले असून जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे.
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर राहून काम करण्याचे आदेश दिले आहेत.
कृषी सल्ला काय?
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांना बुरशीजन्य रोग व कीड लागू शकते. कृषी तज्ज्ञांच्या मते, कापूस पिकावर मावा, पांढरी माशी व करपा रोग टाळण्यासाठी इमिडाक्लोप्रिड किंवा अॅसेटामिप्रिड या घटकांचे कीटकनाशक फवारावे. पाने पिवळी पडू लागल्यास सूक्ष्मअन्नद्रव्यांची फवारणी करणे उपयुक्त ठरेल.
advertisement
सोयाबीन पिकावर पानांवर डाग पडल्यास कार्बेन्डाझिम किंवा मॅन्कोझेब मिश्रणाची फवारणी करावी. गळ येऊ नये म्हणून ट्रायकोडर्मा अथवा योग्य बुरशीनाशकाचा वापर करणे आवश्यक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 7:48 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान :आज पुन्हा आभाळ फाटणार! पीकं भुईसपाट, IMD कडून या जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर