मोठा दिलासा! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणार ८०० कोटी रुपये
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Shetkari Karjmafi : राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी' योजनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी' योजनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत सुमारे ८०० कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील सहकारी बँकिंग व्यवस्था आणि शेतकरी दोघांनाही या निर्णयाचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सरकारच्या घोषणेनुसार सप्टेंबर २०२५ अखेर थकीत असलेल्या पीक कर्जांपैकी दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अशा प्रकारच्या थकीत कर्जदारांची संख्या मोठी आहे. उपलब्ध माहितीनुसार सप्टेंबर २०२५ अखेर दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ३८ हजार ३५८ इतकी आहे. या शेतकऱ्यांकडे एकूण सुमारे २०९.८९ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे.
advertisement
निकष निश्चित होण्याची प्रतीक्षा
कर्जमाफी योजनेची घोषणा झाली असली तरी यासाठीचे अंतिम निकष अद्याप जाहीर झालेले नाहीत. शासनाकडून लवकरच यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र सरकारने स्पष्ट केले आहे की सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेले पीक कर्ज माफीसाठी पात्र मानले जाईल.
योजनेची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी शासनाच्या महाआयटी विभागाच्या माध्यमातून विशेष ऑनलाइन पोर्टल तयार केले जाणार आहे. या पोर्टलवर बँकांना शेतकऱ्यांची कर्जासंबंधी माहिती अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून आवश्यक माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
advertisement
नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही लाभ
या योजनेत केवळ थकीत कर्जदार शेतकऱ्यांनाच दिलासा दिला जाणार नाही, तर नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे. वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे सुमारे दोन लाख कर्जदार खातेदार आहेत. या खातेदारांनी वेळेवर केलेल्या परतफेडीचा विचार केल्यास सुमारे ८०० कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या संख्येने प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत मिळू शकते.
advertisement
जिल्हा बँकेतील कर्जाची स्थिती
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आकडेवारीनुसार मार्च २०२५ अखेर दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज असलेले ४३ हजार ८०८ शेतकरी होते आणि त्यांच्याकडे सुमारे २४०.२९ कोटी रुपयांचे कर्ज होते. सप्टेंबर २०२५ अखेर ही संख्या कमी होऊन ३८ हजार ३५८ शेतकरी राहिले असून थकबाकी २०९.८९ कोटी रुपयांवर आली आहे.
दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या मार्च २०२५ अखेर ३ हजार ९५० होती. त्यांच्याकडे सुमारे १४९.९८ कोटी रुपयांचे कर्ज होते. सप्टेंबर २०२५ अखेर ही संख्या ३ हजार ५५२ इतकी झाली असून त्यांची थकबाकी सुमारे १३६.१४ कोटी रुपये आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 08, 2026 1:44 PM IST






