घोगरे कुटुंबीयांचा शेतात भन्नाट प्रयोग!चार महिन्यांत १८ लाख रुपये, दुष्काळातही घरात येतोय लाखोंनी पैसा, असं केलं तरी काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Farmer Success Story : दुष्काळ, अनिश्चित पाऊस आणि वाढता खर्च यामुळे शेती म्हणजे जुगार, अशी भावना अनेकांमध्ये आहे. मात्र जैतापूर येथील घोगरे कुटुंबीयांनी या समजुतीला छेद देत प्रयोगशील शेतीतून यशाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
मुंबई : दुष्काळ, अनिश्चित पाऊस आणि वाढता खर्च यामुळे शेती म्हणजे जुगार, अशी भावना अनेकांमध्ये आहे. मात्र जैतापूर येथील घोगरे कुटुंबीयांनी या समजुतीला छेद देत प्रयोगशील शेतीतून यशाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. अवघ्या दीड एकर क्षेत्रात हिरवी मिरची आणि आल्याची लागवड करून त्यांनी केवळ चार महिन्यांत तब्बल १८ लाख रुपयांचे घवघवीत उत्पन्न मिळवले आहे. योग्य नियोजन, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचा अचूक अभ्यास केल्यास कमी क्षेत्रातही मोठे यश मिळू शकते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.
परंपरेला छेद देणारी शेतीची वाटचाल
जैतापूर गावातील रघुनाथ राघू घोगरे यांच्याकडे गट क्रमांक ६९ मध्ये सुमारे सात एकर शेती आहे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कैलास आणि सुभाष घोगरे हे दोन्ही भाऊ गेली वीस वर्षे शेतीची जबाबदारी सांभाळत आहेत. पारंपरिक पिकांमधून मर्यादित उत्पन्न मिळत असल्याने काहीतरी वेगळे करण्याचा विचार त्यांनी केला. याच विचारातून मिरची आणि आलं या उच्च मूल्याच्या पिकांची निवड करण्यात आली.
advertisement
एक एकर मिरचीने बदलले आर्थिक चित्र
मागील वर्षी श्रावण महिन्यात एक एकर क्षेत्रात सुमारे ३,२०० मिरचीची रोपे लावण्यात आली. लागवडीसाठी मल्चिंग आणि ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. रोपे, मजुरी आणि आवश्यक साहित्य यासाठी साधारण एक लाख रुपयांचा खर्च आला. नवरात्रीपासून आतापर्यंत तब्बल नऊ तोडण्या घेण्यात आल्या. दर्जेदार उत्पादन आणि योग्य वेळी विक्रीमुळे बाजारात उत्तम दर मिळाला आणि या एकाच एकरातून सुमारे साडेतेरा लाख रुपयांचे उत्पन्न घोगरे कुटुंबीयांना मिळाले.
advertisement
अर्धा एकर आल्याने दिली उत्पन्नाला भर
मिरचीसोबतच गेल्या दोन वर्षांपासून अर्ध्या एकरात आल्याची लागवड करण्यात येत आहे. यंदा आल्यालाही समाधानकारक बाजारभाव मिळाल्याने सुमारे तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. कमी क्षेत्रात योग्य व्यवस्थापन आणि उच्च मूल्याचे पीक घेतल्यास उत्पन्नात लक्षणीय वाढ कशी होते, याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे.
बाजारपेठेचा अचूक अभ्यास ठरला निर्णायक
घोगरे कुटुंबीयांनी परळी, सिरसाळा, दिंद्रुड, माजलगाव आणि अंबाजोगाई येथील बाजारपेठांचा सखोल अभ्यास केला. होलसेल दराने मिरची आणि आल्याची विक्री करत योग्य वेळ साधल्यामुळे दरांचा जास्तीत जास्त लाभ त्यांना मिळाला. केवळ उत्पादनावर नाही, तर विक्री व्यवस्थापनावरही त्यांनी तितकाच भर दिला.
advertisement
कमी क्षेत्र, मोठे स्वप्न
दीड एकरात घेतलेल्या मिरची आणि आल्याच्या पिकामुळे घोगरे कुटुंबीय लखपती झाले आहेत. कमी क्षेत्रात उच्च मूल्याचे पीक घेऊन योग्य तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन केल्यास शेतीतूनही आर्थिक समृद्धी साधता येते, हे या यशोगाथेतून स्पष्ट झाले आहे.
“वडील रघुनाथ घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शेती करतो. नवनवीन प्रयोग करण्याच्या विचारातून मिरची आणि आल्याची लागवड केली. यंदा चांगला भाव मिळाल्याने लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले. सातत्य आणि प्रामाणिक मेहनतीचे हे फळ आहे,” अशी भावना शेतकरी कैलास घोगरे यांनी व्यक्त केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 7:28 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
घोगरे कुटुंबीयांचा शेतात भन्नाट प्रयोग!चार महिन्यांत १८ लाख रुपये, दुष्काळातही घरात येतोय लाखोंनी पैसा, असं केलं तरी काय?







