पशुधन नुकसान भरपाई नियमांत राज्य सरकारकडून मोठे बदल! नव्याने किती पैसे मिळणार?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : गेल्या वर्षी राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पशुधनाचे नुकसान झाले होते.
मुंबई : गेल्या वर्षी राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पशुधनाचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकसानभरपाईच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत पशुपालकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी नुकसानभरपाईसाठी पशुधनाच्या संख्येवर असलेली मर्यादा आता हटवण्यात आली असून, त्यामुळे अधिकाधिक शेतकरी आणि पशुपालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
नुकसानभरपाईच्या नियमांमध्ये मोठा बदल
देवेंद्र फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या नव्या धोरणानुसार विविध प्रकारच्या पशुधनासाठी निश्चित मदत दर जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार, गोठ्याच्या नुकसानीसाठी प्रति गोठा तीन हजार रुपये मदत दिली जाणार आहे. दुभत्या जनावरांसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले असून, ओढकाम करणाऱ्या पशुधनासाठी प्रति जनावर ३२ हजार रुपये मदत दिली जाईल. लहान पशुधनासाठी प्रति पशुधन २० हजार रुपये तर शेळी-मेंढ्यांसाठी प्रति प्राणी चार हजार रुपये मदत मिळणार आहे. याशिवाय कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रति कोंबडी १०० रुपये इतकी नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली आहे.
advertisement
शेतकऱ्यांना मोठा दिलासा
या निर्णयामुळे राज्यातील हजारो पशुपालकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या भागांमध्ये गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली होती. आता नवीन नियमांमुळे त्यांना पुन्हा उभे राहण्यास मदत मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
advertisement
मदत वितरणाची ठरलेली प्रक्रिया
दरम्यान, या मदतीच्या वितरणासाठी राज्य सरकारने स्पष्ट कार्यपद्धतीही जाहीर केली आहे. त्यानुसार, पशुधनाच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल तलाठी तयार करून तहसीलदारांकडे पाठवला जाईल. त्यानंतर संबंधित माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली जाईल आणि पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यामुळे नुकसानभरपाईचे वितरण अधिक पारदर्शक आणि जलद होण्यास मदत होईल.
आवश्यक कागदपत्रे अनिवार्य
नुकसानभरपाई मिळवण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये मृत पशुधनासाठी शवविच्छेदन अहवाल, बेपत्ता प्रकरणांमध्ये पंचनाम्याची प्रत, तसेच लाभार्थ्याचा आधार क्रमांक आणि बँक खात्याची माहिती सादर करणे आवश्यक असेल. या प्रक्रियेमुळे खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचेल, असा सरकारचा विश्वास आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 10:50 AM IST










