Maharashtra Cabinet Meeting : दिवाळी आधी सरकारकडून शेतकऱ्यांना कोट्यवधींची मदत! कोणाला किती पैसे मिळणार?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Maharashtra Flood : आज मंगळवार (७ ऑक्टोबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे.
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजवला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठ्या आर्थिक मदत पॅकेजची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
किती मिळणार मदत?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, यंदा २९ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे आयुष्य पुन्हा उभे राहावे यासाठी सरकारने मोठे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. डोंगरी भागातील घरांना १० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. पूरात मृत्यूमुखी पडलेल्या दुधाळ जनावरांसाठी ३७ हजार रुपये, तर खरडून गेलेल्या शेतीजमिनींसाठी ४२ हजार रुपये प्रति हेक्टर इतकी मदत दिली जाईल.
advertisement
याशिवाय, प्रति विहीर ३० हजार रुपये, ग्रामीण भागातील बाधित पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी १५०० कोटी रुपयांचा निधी, तसेच रब्बी हंगामासाठी बियाण्यांसाठी अतिरिक्त मदत जाहीर करण्यात आली आहे. विमा असलेल्या ४५ लाख शेतकऱ्यांना १७ हजार रुपये प्रति हेक्टर, कोरडवाहू शेतकऱ्यांना ३५ हजार रुपये, तर बागायती शेतीसाठी ५० हजार रुपये प्रति हेक्टर इतकी मदत दिली जाणार आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल.
advertisement
अतिवृष्टीमागील कारणे
हवामान तज्ज्ञांच्या मते, जागतिक तापमानवाढ (Global Warming) हे अतिवृष्टीमागील प्रमुख कारण आहे. वाढत्या उष्णतेमुळे पावसाची पद्धत पूर्णपणे बदलली असून, पूर्वी महिनाभर हळूहळू पडणारा पाऊस आता काही तासांतच कोसळतो. तसेच जंगलतोड, नद्यांवरील अतिक्रमण आणि बेकायदेशीर शहरीकरणामुळे जलप्रवाह अडवला जातो आणि पाण्याचा निचरा होत नाही, परिणामी पूरस्थिती निर्माण होते.
शेतीवर गंभीर परिणाम
पूरामुळे शेतीतील वरची सुपीक माती वाहून गेल्याने जमिनीची उर्वरता कमी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नव्या हंगामापूर्वी जमीन पुन्हा तयार करण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. यामुळे उत्पादन खर्च वाढेल आणि उत्पन्न घटेल. शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाच्या मदतीशिवाय पर्याय नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 07, 2025 3:11 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Maharashtra Cabinet Meeting : दिवाळी आधी सरकारकडून शेतकऱ्यांना कोट्यवधींची मदत! कोणाला किती पैसे मिळणार?