हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत मंगळवारी (१४ ऑक्टोबर) ८१० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. बाजारात प्रति क्विंटल किमान ३६०० रुपये ते कमाल ४२०० रुपये असा दर नोंदवला गेला, तर सरासरी दर ३९०० रुपये इतका राहिला. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीभावानुसार सोयाबीनसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) प्रति क्विंटल ५३२८ रुपये आहे. परंतु, सध्या मिळणारा दर हमीभावापेक्षा शेकडो रुपयांनी कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.
advertisement
दर घसरण्याचे कारण काय?
हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये गेल्या काही आठवड्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे शेतातील पिकांमध्ये ओलावा वाढला, परिणामी दाण्यांवर काळे डाग पडले आहेत. काही भागांत ओलाव्याचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांपर्यंत नोंदवले गेले आहे. या परिस्थितीत व्यापाऱ्यांनी गुणवत्ता कमी असल्याचे सांगत दर घटवले आहेत.
हिंगोली धान्य बाजारात सोमवारी (१३ ऑक्टोबर) देखील सोयाबीनची ८१० क्विंटल आवक झाली होती. त्यावेळी दर ३६०० ते ४२०० रुपये दरम्यान होते. मानवत बाजार समितीत ५२८ क्विंटल आवक झाली असून, प्रति क्विंटल दर ३५५१ ते ४२०० रुपये, तर सरासरी ४०२५ रुपये मिळाले. सेलू बाजार समितीत २८७ क्विंटल आवक असून, दर ३०७१ ते ४०२६ रुपये आणि सरासरी ३७९९ रुपये होते. जिंतूर बाजारात ७४ क्विंटल सोयाबीन विकले गेले, ज्याचा दर ३७०० ते ४०२५ रुपये दरम्यान होता.
तर परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (११ ऑक्टोबर) ११५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्यावेळी किमान दर ३९०० रुपये, कमाल ४२५० रुपये आणि सरासरी दर ४२०० रुपये इतका होता. सर्व बाजार समित्यांतील दर पाहता, सोयाबीन उत्पादकांना हमीभाव मिळणे सध्या दूरची गोष्ट ठरली आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर घसरण
उघडीप मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी सुगीला वेग दिला आहे. आर्थिक गरज भासल्याने तसेच दिवाळीचा सण जवळ आल्याने अनेक शेतकरी माल बाजारात आणत आहेत. मात्र, गुणवत्तेच्या कारणास्तव दरात होणारी घट शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम करत आहे.