मराठवाड्यासाठी पुढील दोन दिवस धोक्याचे
भारतीय हवामान खात्याच्या ताज्या माहिती नुसार , पश्चिम विदर्भ आणि परिसरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. गेल्या ६ तासांत हा पट्टा ४३ किमी प्रतितास वेगाने पश्चिमेकडे सरकला आहे. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता हा प्रणाली अकोल्याच्या दक्षिणेस ५० किमी, संभाजीनगरच्या ईशान्येस १८० किमी, नाशिकपासून ३३० किमी व सुरतपासून ५४० किमी अंतरावर केंद्रित होती. हवामान विभागाचा अंदाज आहे की पुढील १२ तासांत हा पट्टा मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातून पश्चिमेकडे सरकत कमकुवत होईल आणि कमी दाबाच्या क्षेत्रात परिवर्तित होईल. मात्र, या कालावधीत पावसाचा जोर कायम राहणार आहे.
advertisement
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस
मराठवाड्यात या वर्षीचा पाऊस सरासरीपेक्षा बऱ्याच प्रमाणात जास्त झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर : सरासरी ५८१.७ मिमीच्या तुलनेत ७०८.१ मिमी पाऊस (१२०%).
जालना : ६३०.१ मिमीच्या तुलनेत ७७१.८ मिमी (१२८%).
बीड : ५६६ मिमीच्या तुलनेत ८३५ मिमीपेक्षा जास्त (१४७.६%).
लातूर : ७०६ मिमीच्या तुलनेत ८९४ मिमीपेक्षा जास्त (१२६.७%).
धाराशिव : ६०३.१ मिमीच्या तुलनेत ९२४.६ मिमी (१५३.३%).
नांदेड : ८१४.४ मिमीच्या तुलनेत १०८५ मिमी (१३३.२ %).
परभणी : ६६१.३ मिमीच्या तुलनेत ८७४ मिमी (११४.९%).
हिंगोली : ७९५.३ मिमीच्या तुलनेत १०६२.८ मिमी (१३३.६%).
मुंबईची काय परिस्थिती?
तर दुसरीकडे मुंबई शहरमध्ये सरासरीपेक्षा -४% ने पाऊस कमी आहे तर मुंबई उपनगरमध्ये सरासरी पेक्षा +२९ % जास्त पाऊस पडला आहे.
ही आकडेवारी स्पष्ट दर्शवते की, की मराठवाडा सध्या अत्याधिक पावसाच्या तडाख्यात आहे, ज्यामुळे शेती, जनजीवन आणि पायाभूत सुविधांवर मोठा परिणाम झाला आहे.
उर्वरित महाराष्ट्रातही सतर्कता
फक्त मराठवाडाच नव्हे, तर उर्वरित महाराष्ट्रातही हवामान विभागाने अलर्ट जारी केले आहेत. रायगडमध्ये रेड अलर्ट, तर पुणे, नाशिक, ठाणे, पालघर आणि धरण क्षेत्रांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नद्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.
दरम्यान, मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी पुढील दोन दिवस निर्णायक ठरणार आहेत. आधीच सरासरीपेक्षा जास्त पावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा नवा पाऊस आणखी नुकसानदायक ठरू शकतो. शासन आणि प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.