संघर्षातून घडलेलं यश
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गावातील २४ वर्षीय श्रद्धा ढवण ही शेतकरी कुटुंबात जन्मलेली. वडील म्हशींच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असत. घरची परिस्थिती हलाखीची, वडील अपंग आणि भावंडे लहान असल्याने कुटुंबाची जबाबदारी लवकरच श्रद्धाच्या खांद्यावर आली. लहानपणापासूनच गोठा, म्हशी आणि कष्ट हे तिच्या आयुष्याचा भाग बनले.
शिक्षण आणि व्यवसायाची सांगड
advertisement
श्रद्धाने भौतिकशास्त्रात एम.एस्सी. शिक्षण घेतले असून ती तायक्वांडो खेळाडू म्हणूनही ओळखली जाते. शिक्षण घेत असतानाच तिने भावाच्या मदतीने दोन म्हशी घेऊन दुग्धव्यवसाय सुरू केला. ती स्वतः दूध काढायची, मोटारसायकलवरून दूध विकायला जायची आणि प्रत्येक रुपयाचा काटेकोर वापर करून व्यवसाय वाढवत गेली.
नियोजनातून विस्तार
सुरुवातीला छोट्या प्रमाणात सुरू झालेला व्यवसाय श्रद्धाने नियोजनपूर्वक वाढवला. नफ्यातील रक्कम पुन्हा व्यवसायात गुंतवत तिने म्हशींची संख्या वाढवली, दुधाची गुणवत्ता सुधारली आणि आधुनिक व्यवस्थापन पद्धती स्वीकारल्या. आज तिच्याकडे सुमारे ८० म्हशी असून त्यांच्यासाठी सुसज्ज असा दोन मजली गोठा उभारण्यात आला आहे.
बायोगॅस आणि शून्य कचरा व्यवस्थापन
केवळ दुग्धव्यवसायावर न थांबता श्रद्धाने बायोगॅस प्रकल्प, वीज निर्मिती आणि शून्य कचरा व्यवस्थापन पद्धती राबवल्या. शेण आणि मलमूत्रापासून बायोगॅस निर्मिती करून घरगुती गॅस, वीज आणि पाण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला. पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळाली असून स्लरी विक्रीतून अतिरिक्त उत्पन्नही सुरू झाले आहे.
शेतीपूरक उद्योगांचा विकास
बायोगॅससोबतच श्रद्धाने गांडूळ खत आणि जैविक खत प्रकल्प सुरू केले. या प्रकल्पांमुळे शेणाचा पूर्ण वापर होतो आणि सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त खत उपलब्ध होते. यामुळे उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण झाले आहेत.
‘श्रद्धा फार्म’ – तरुणांसाठी प्रेरणास्थान
आपल्या अनुभवातून मिळालेलं ज्ञान केवळ स्वतःपुरतं न ठेवता श्रद्धाने ‘श्रद्धा फार्म’ या प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली. पशुपालन, दुग्धव्यवसाय, बायोगॅस, जैविक खत आणि शून्य कचरा व्यवस्थापन यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण येथे दिले जाते. या केंद्रातून बाहेर पडणाऱ्या तरुणांमध्ये आत्मविश्वास आणि व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा निर्माण होते.
टोमण्यांवर मात करत घडलेली ओळख
गावकऱ्यांचे टोमणे, मित्रमैत्रिणींची टीका आणि सामाजिक दबाव असूनही श्रद्धाने कधीही हार मानली नाही. कुटुंबाची जबाबदारी आणि स्वतःचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून तिने रात्रंदिवस मेहनत घेतली. आज एका-दोन म्हशींपासून सुरू झालेला हा व्यवसाय महिन्याला ७ ते ८ लाख रुपयांचे उत्पन्न देत आहे.
