मुंबई : बदलत्या काळात शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन न राहता उत्पन्नाचे मोठे माध्यम बनत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, योग्य पिकांची निवड आणि बाजारपेठेचा अचूक अभ्यास केल्यास शेतीतूनही कोट्यवधींचा नफा मिळवता येतो, हे अनेक शेतकरी दाखवून देत आहेत. अशीच एक प्रेरणादायी कहाणी राजस्थानमधील एका तरुण अभियंत्याची आहे. सुरक्षित सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी शेतीकडे वळण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि कोरफडीच्या लागवडीमुळे अवघ्या काही वर्षांत ते यशस्वी उद्योजक आणि करोडपती शेतकरी बनले आहेत.
advertisement
नोकरीत मन रमेना
राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील रहिवासी हरीश धनदेव हे मूळचे सरकारी सेवेत कार्यरत होते. जैसलमेर नगर परिषदेत ते कनिष्ठ अभियंता म्हणून काम पाहत होते. मात्र, ठराविक चौकटीतील नोकरीपेक्षा काहीतरी वेगळे, स्वतःचे आणि नवकल्पनांवर आधारित करण्याची इच्छा त्यांच्यात होती. अनेक विचारांनंतर त्यांनी सरकारी नोकरी सोडण्याचा मोठा निर्णय घेतला. सुरुवातीला हा निर्णय धोकादायक वाटत असला तरी हरीश यांनी आत्मविश्वासाने शेतीत पाऊल टाकले.
120 एकरावर कोरफडीची लागवड केली
हरीश धनदेव यांनी जैसलमेरसारख्या कोरडवाहू आणि कमी पावसाच्या प्रदेशात कोरफडीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. कोरफड हे कमी पाण्यात वाढणारे, औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण पीक असल्याने त्यांनी यावर लक्ष केंद्रित केले. सुरुवातीला मर्यादित क्षेत्रात प्रयोग म्हणून लागवड सुरू करण्यात आली. मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर त्यांनी आपल्या सुमारे १२० एकर जमिनीवर ‘बार्बी डेनिस’ या कोरफडीच्या विशेष जातीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. ही जात आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी असलेली मानली जाते.
‘नेचरलो अॅग्रो’ नावाची स्वतःची कंपनी
शेतीपुरतेच न थांबता हरीश यांनी व्यवसायिक दृष्टिकोनातून पुढचे पाऊल उचलले. त्यांनी ‘नेचरलो अॅग्रो’ नावाची स्वतःची कंपनी स्थापन केली. या माध्यमातून कोरफडीची लागवड, प्रक्रिया आणि विक्री यावर भर देण्यात आला. सुरुवातीला काही हजार रोपांपासून सुरू झालेला हा प्रवास आज लाखो रोपांपर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या शेतातून तयार होणारा कोरफड देशांतर्गतच नव्हे तर हाँगकाँग, ब्राझील, अमेरिका यांसारख्या देशांमध्ये निर्यात केला जातो.
पतंजलीसोबत भागीदारी
हरीश धनदेव यांच्या यशामागे पतंजलीसारख्या मोठ्या ब्रँडसोबत झालेली भागीदारीही महत्त्वाची ठरली. या सहकार्यामुळे त्यांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळाली आणि व्यवसायाला वेग आला. आज हरीश हे देशातील प्रमुख कोरफड निर्यातदारांपैकी एक मानले जातात. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करून त्यांनी शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला आहे.
जैसलमेरच्या वाळवंटी जमिनीतून कोरफडीसारख्या पिकाची संधी ओळखून ती यशस्वीपणे साकार करणारे हरीश धनदेव आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. योग्य नियोजन, मेहनत आणि बाजारपेठेची जाण असल्यास शेतीतही उज्ज्वल भविष्य घडवता येते, याचे ते जिवंत उदाहरण आहेत.
