टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही अशी म्हण आपल्याकडे आहे. त्याचबरोबर अपमानाचा घोट गिळल्याशिवाय यशाचे शिखर गाठता येत नाही हे देखील तितकेच खरं. अपमानाची एक सल मनात रुतली आणि जालन्यातील सतीश तौर यांनी एकामागून एक हार्वेस्टर घेण्याचा धडाकाच लावला. तेही एका सर्वसामान्य भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्याने.
advertisement
2008-09 चा काळ. तौर कुटुंबाने त्यांच्या 15 एकर शेतीमध्ये गव्हाची लागवड केली होती. गहू काढणीसाठी त्याकाळी पंजाब राज्यातून हार्वेस्टर यायचे. गहू काढण्यासाठी सुरुवातीला असलेला 900 रुपये दर लोकांची चढाओढ आणि मागणी पाहून चालकांनी 1800 रुपयांपर्यंत वाढवला. परंतु तरीदेखील त्यांच्या 15 एकर क्षेत्रावरील गहू काढण्यासाठी हार्वेस्टर चालक त्यांच्या शेताकडे फिरकला नाही. चार ते पाच दिवस पाठलाग केल्यानंतर तौर यांनी दोन हजार रुपये त्याच्या हातावर टेकवले आणि माझ्या शेतातील गहू काढण्यासाठी चल असं म्हटलं.
तेव्हा हार्वेस्टर चालकाचा पारा चढला. तू काय माझ्या मशीनचा मालक झालाय का, असे शब्द त्याने तौर यांना वापरले. झालेला अपमान त्यांनी तसाच गिळला. पण अपमानाची सल तशीच मनात ठेवून जिद्दीने पेटून उठले. 2009 मध्ये पहिला हार्वेस्टर खरेदी केला आणि एका मागून एक हार्वेस्टरची रांगच लावली.
सोयाबीन, गहू, तूर, मका, मूग आणि उडीद आणि हरभरा अशा पिकांची हार्वेस्टरच्या माध्यमातून ते काढणी करतात. एका मशीनवर किमान तीन कामगारांची आवश्यकता असते. सर्व 35 मशीन सुरू असतील तर त्यांच्याकडे 70 ते 100 कामगार काम करतात. याच हार्वेस्टरच्या माध्यमातून आम्ही 15 एकर शेती 35 एकर वाढवली असल्याचे त्यांचा धाकटा मुलगा सयाजी तौर याने सांगितले. सतीश आणि सयाजी या पितापुत्राची ही कहाणी सर्वांसाठीच प्रेरणादायी अशीच आहे.





