कोरोना काळात घेतलेला धाडसी निर्णय
बोरकर कुटुंबाकडे आधीपासूनच म्हशी होत्या आणि ते दूध विक्री करत होते. पण महामारीमुळे सर्वत्र आर्थिक अनिश्चितता निर्माण झाली. या काळात ‘काहीतरी नवीन करायलाच हवं’ या निर्धाराने त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. घरातील दूध पुरेसे नसल्याने त्यांनी परिसरातील इतर शेतकरी व पशुपालकांकडून दूध खरेदी सुरू केली. त्यांच्या मेहनतीचे फळ आज मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. बोरकर कुटुंब आज वर्षाला चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न कमवते.
advertisement
नऊ म्हशी, 30 लिटर दूध, पण मागणी 800 लिटरपर्यंत
सध्या बोरकर कुटुंबाकडे नऊ म्हशी असून त्यातून रोज सुमारे 30 लिटर दूध मिळते. मात्र त्यांच्या ग्राहक संख्येत झालेल्या वाढीमुळे त्यांना प्रतिदिन 800 लिटर दूध बाहेरून खरेदी करावे लागते. हे दूध ते प्रतिलिटर 50 रुपये दराने घेऊन पॅकिंग करतात आणि आरमोरी, गडचिरोली तसेच आसपासच्या भागात वितरित करतात. दर्जेदार दूध आणि शुद्धतेमुळे त्यांच्या उत्पादनांना कायमच चांगली मागणी असते.
या सर्व कामात बोरकर यांना पत्नी अलका आणि मुलगा राहुल यांचे मोठे सहकार्य मिळते. तिघेही व्यवसायातील विविध जबाबदाऱ्या विभागून घेतात आणि प्रत्येक टप्प्यावर पूर्ण प्रामाणिकपणे काम करतात.
घरचा चारा, कमी खर्च, अधिक नफा
यादव बोरकर आता साठ वर्षांचे झाले आहेत. घरच्या दोन एकर शेतीत ते जनावरांसाठी लागणारा चारा स्वतः तयार करतात. त्यामुळे पशुपालनाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यांचे हे मॉडेल गावातील इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन व चांगल्या दर्जाच्या दुधामुळे त्यांची बाजारातील प्रतिष्ठा वाढली आहे.
दुधाबरोबर दुग्धजन्य पदार्थांचीही निर्मिती
फक्त दूध विक्रीवर न थांबता बोरकर कुटुंबाने दुग्धजन्य उत्पादनांची निर्मितीही सुरू केली. त्यांच्याकडे खालील उत्पादने तयार केली जातात जसे की, ताक, तूप, खवा श्रीखंड, पनीर.त्यांचे पनीर तर आरमोरीच्या बाहेर मोठ्या शहरांतही विकले जाते. वाढती मागणी त्यांच्या व्यवसायाच्या दर्जाची साक्ष देते.
स्थिर उत्पन्नाचा मजबूत आधार
कोरोना काळात घेतलेल्या निर्णयाने बोरकर कुटुंबाला आज मजबूत आर्थिक पाया दिला आहे. छोट्या पातळीवर सुरू झालेला उपक्रम आज मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे.
एकूणच, कुटुंबातील एकोप्याने, मेहनतीने आणि गुणवत्तेवरच्या भरामुळे बोरकर कुटुंबाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांची ही यशोगाथा ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना प्रेरणा देणारी ठरते.
