अमरावती - सततच्या पावसामुळे यावर्षी अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबिन पिकाचे भरपूर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न कमी झाले आणि आता अशातच सोयाबिनला भाव सुद्धा कमी मिळत आहे. गेल्या 10 वर्षात शेतकऱ्यांची अशी अवस्था कधीही झालेली नव्हती. त्यामुळे यावर्षी शेतकरी जास्त चिंतेत आहे.
अमरावतीमध्ये सोयाबिनला हमीभाव 4892 रुपये आहे. पण शेतकऱ्यांच्या हाती 3800 रुपयांपेक्षा कमी पैसे येत आहे. त्यामुळे शेतकरी संतापलेला आहे. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील काही शेतकऱ्यांशी लोकल18 च्या टीमने संवाद साधला. तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा व्यक्त केल्या.
advertisement
अंकुश बानासुरे हे शेतकरी म्हणाले की, मागील 15 वर्षांपासून ते शेती करत आहेत. पण यावर्षी सारखी पडती बाजू कधीही बघितली नाही. आधी पावसाने नुकसान केले आणि आता सोयाबिनला भाव मिळत नाही. शेतकरी जेव्हा शेती करतो तेव्हा त्याला अनेक खर्च असतात.
तो खर्च करताना शेतकऱ्याकडून कोणीही कमी पैसे घेत नाही. पण शेतकऱ्याच्या मालाला भाव देण्याच्या वेळी मात्र अनेक विचार केले जातात. कोणते ना कोणते कारण देऊन शेतकऱ्याच्या पिकाला कमी भाव दिला जातो. यावर्षी उत्पन्न कमी असल्याने सोयाबीनला 10 हजार रुपये भाव मिळाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
शेतकरी राजूभाऊ ससाने म्हणाले की, शेतकऱ्यांचे कष्ट आणि हालअपेष्टा बघता यावर्षी सोयाबीनला भाव हा 7 ते 8 हजारपर्यंत मिळायला पाहिजे. हा भाव आता मिळत असलेल्या भावापेक्षा बरा राहील. शेतकऱ्याची मेहनत खूप जास्त असते. त्यामुळे त्याला त्याच्या कष्टाची किंमत ही व्यवस्थित मिळायला पाहिजे. वलगावमध्ये एका शेतकऱ्याला कमी सोयाबीन झाल्याने जागेवर अटॅक आलेला आहे. याकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांचे प्रतिनिधी सुरेंद्र धामणकर यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, ते गेले 20 वर्षापासून मार्केटमध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. पण यावर्षी सारखी परिस्थिती त्यांनी अजूनही बघितली नाही. यावर्षी शेतकऱ्याला सोयाबीन उत्पादन हे एकरी एक, दोन, तीन क्विंटलच्या वर झालेले नाही आणि खर्च हा प्रति एकर 10 ते 20 हजार रुपये झाला आहे. म्हणजेच यावर्षीच्या सोयाबिनच्या भावाने शेतकऱ्याचा खर्च सुद्धा निघत नाही.
त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि त्यांच्या कडे लक्ष द्यावे. हमी भाव हा 4892 रुपये आहे आणि शेतकऱ्यांच्या हातात 3800 च्या आत पैसे येत आहे. या वर्षी शेतकरी आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने विशेष लक्ष देणे गरजचे आहे, असेही त्यांनी सांगितले.