फक्त नववी पर्यंत शिक्षण
वैशाली उदार असं महिला शेतकऱ्याचे नाव असून त्या त्र्यंबक तालुक्यातील भातपट्ट्यातील मुरुमहट्टी गावातील रहिवाशी आहेत. त्यांचं शिक्षण केवळ नववीपर्यंत झालं. २००५ साली त्यांचं लग्न कोणे गावातील शेतकरी कुटुंबात झालं. सासरचं घर लहान शेत असून, उदरनिर्वाहासाठी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मोलमजुरीवर अवलंबून रहावं लागायचं. त्याच काळात गावात सुरू झालेल्या महिला बचत गटात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला, आणि याच गटातून त्यांना नव्या व्यवसायाची दिशा मिळाली.
advertisement
मोलमजुरीऐवजी मशरूम शेतीचा मार्ग
आज वैशाली उदार पाच वर्षांपासून यशस्वीपणे मशरूम शेती करत आहेत. त्यांनी दहा बेडपासून सुरुवात केली होती, आणि आज त्यांच्या सुसज्ज शेडमध्ये ४०० पेक्षा अधिक बेड्स आहेत. कमी जागा, कमी भांडवल आणि सतत बाजारपेठ असलेला हा व्यवसाय त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. त्यांच्या म्हणण्यानुसार, “पूर्वी दररोजच्या मजुरीवर जगावं लागायचं, पण आज मशरूम शेतीमुळे मी स्वतःच्या पायावर उभी आहे. या व्यवसायाने माझा आणि माझ्या कुटुंबाचा संसार फुलवला.”
शेतीला जोड व्यवसायाचा उत्तम पर्याय
वैशाली उदार यांनी केवळ आपलं आयुष्य बदललं नाही, तर गावातील अनेक महिलांना या व्यवसायाकडे प्रेरित केलं आहे. त्यांचं मत आहे की, शिक्षण कमी असलं तरीही इच्छाशक्ती आणि मेहनत असेल तर कुणीही मशरूम शेती करू शकतं. आज त्यांच्या उत्पादनाला मुंबई, दिल्ली, हिमाचल प्रदेश अशा राज्यांतून मागणी येते. त्या सांगतात, “२५० ते ३०० रुपये रोज मिळवणाऱ्या महिलांनी मशरूम शेती सुरू केली, तर त्या स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतात.”
मशरूम शेतीचे गणित
या शेतीसाठी प्रामुख्याने भात, गहू आणि सोयाबीनचा भुसा वापरला जातो. सुरुवातीला भुसा काही तास पाण्यात भिजवून उकळवला जातो आणि सुकवून त्याचे बेड तयार केले जातात. त्यात मशरूमचे बियाणे भरल्यानंतर सुमारे २० दिवसांनी उत्पादन मिळते. एक बॅच संपल्यानंतर उरलेल्या भुशापासून गांडूळखत तयार केले जाते, ज्यामुळे शेतीसाठी पूरक उत्पन्न मिळतं.
स्त्रीशक्तीचा प्रेरणादायी संदेश
वैशाली उदार यांची ही कहाणी ग्रामीण महिलांसाठी प्रेरणादायी आहे. कमी शिक्षण असूनही त्यांनी स्वावलंबनाचा मार्ग निवडला. आज त्या केवळ यशस्वी शेतकरी नाहीत, तर इतर महिलांसाठी आत्मनिर्भरतेचं जिवंत उदाहरण बनल्या आहेत. “शिक्षण कमी असलं तरी स्वप्नं मोठी असावीत. मी केलं तर तुम्हीही करू शकता.” असंही त्यांनी म्हंटले आहे.
एकूणच, वैशाली उदार यांची मशरूम शेती ही ग्रामीण भागातील महिलांसाठी नवीन आशेचा किरण ठरली आहे. जिद्द, परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी दाखवून दिलं की, संकटं कितीही मोठी असली तरी इच्छाशक्ती असेल, तर यश नक्की मिळतं.
