शासन निर्णय काय?
शासन निर्णयानुसार, प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला १० किलो गहू, १० किलो तांदूळ, ३ किलो तूरडाळ आणि ५ लिटर केरोसिन मोफत देण्यात येणार आहे. याशिवाय, गव्हाऐवजी अतिरिक्त तांदळाची मागणी असल्यास, कुटुंबांना एकूण २० किलो तांदूळ दिला जाईल.
तूरडाळ खरेदीचे निर्देश
पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीत तूरडाळीचा समावेश विशेष बाब मानली जात आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना घाऊक बाजारात उपलब्ध दरानुसार तूरडाळ खुल्या बाजारातून खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. खरेदी पारदर्शक आणि नियमानुसार करणे बंधनकारक असेल.
advertisement
अधिकाऱ्यांची जबाबदारी
जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी नैसर्गिक आपत्ती सुरु झाल्याची तारीख, बाधित कुटुंबांची संख्या, अन्नधान्याचे वितरण, तूरडाळीची खरेदी व त्यासाठी लागलेला खर्च याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करून शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे.
निधीची तरतूद
जिल्ह्यांकडून निधीची मागणी झाल्यास, चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील तरतूदीतून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
पूरग्रस्तांसाठी मोठा आधार
राज्यात अजूनही अनेक भागांमध्ये पाण्याचा प्रकोप सुरू असून शेकडो कुटुंबे संकटात आहेत. शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाल्यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत शासनाचा हा निर्णय पूरग्रस्तांसाठी मोठा दिलासा ठरणार असून त्यांच्या जगण्याला तात्पुरता आधार मिळणार आहे.
तर दुसरीकडे राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाची बैठक मंगळवारी पार पडली या बैठकीमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.