मुंबई : आपण रोजच्या आयुष्यात अनेक फुले निरुपयोगी समजून टाकून देतो. मंदिरे, कार्यक्रम किंवा शेतातून उरलेली ही फुले बहुतांश वेळा नद्या, कालवे किंवा कचऱ्यात जातात. मात्र हीच टाकाऊ समजली जाणारी फुले एखाद्या शेतकऱ्यासाठी सोन्याचे पीक ठरू शकतात, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशातील शेखपूर गावातील शेतकरी शिवराज निषाद हे ठरले आहेत. एकेकाळी कुणालाही नको असलेली फुले आज त्यांच्या यशस्वी व्यवसायाची ओळख बनली असून, या उपक्रमातून ते लाखोंचा नफा कमावत आहेत.
advertisement
निर्णय का घेतला
सुमारे तीन दशकांहून अधिक काळ औषधनिर्माण क्षेत्रात काम केल्यानंतर शिवराज निषाद यांनी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी पारंपरिक पद्धतीने फुलांची लागवड सुरू केली. मात्र फुलांचे आयुष्य कमी असल्याने आणि वेळेत बाजारपेठ न मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर फुले वाया जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिसरातील अनेक शेतकरी आपले फुलांचे उत्पादन विकू न शकल्याने थेट गंगेत टाकत होते. त्या काळात एक किलो फुलांनाही खरेदीदार मिळत नव्हता. ही समस्या पाहून शिवराज निषाद यांनी अडचणीतच संधी शोधली.
अन् व्यवसाय सुरू केला
त्यांनी फुलांचे शेल्फ लाइफ वाढवण्यावर आणि त्यांना पर्यायी बाजारपेठ मिळवून देण्यावर संशोधन सुरू केले. औषधी आणि आयुर्वेदिक क्षेत्रातील अनुभवामुळे त्यांना फुलांचे औषधी महत्त्व माहीत होते. याच विचारातून त्यांनी फुले वाळवण्याची प्रक्रिया अवलंबली. वाळवलेली फुले केवळ जास्त काळ टिकतात असे नाही, तर आयुर्वेदिक, हर्बल आणि चहा उद्योगात त्यांना चांगली मागणी असते, हे त्यांनी ओळखले.
शिवराज निषाद यांनी चमेली, गुलाब यांसारख्या फुलांच्या पाकळ्या सुकवण्यासाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या ड्रायरचा वापर सुरू केला. सुरुवातीला उघड्यावर फुले वाळवताना धूळ, पक्षी आणि हवामानामुळे अडचणी येत होत्या. मात्र सौर ड्रायरमुळे ही समस्या दूर झाली. त्यांच्या मते, “सौर ड्रायरमुळे धूळ आत येत नाही. वाळवलेली फुले अन्न-दर्जाची, शुद्ध आणि दर्जेदार राहतात.” 40 ते 45 अंश सेल्सिअस इतक्या नियंत्रित तापमानात फुले सुकवल्यामुळे त्यांचा नैसर्गिक रंग, सुगंध आणि गुणवत्ता कायम राहते.
महिन्याला करतोय लाखोंची कमाई
आज शिवराज निषाद दरमहा सुमारे 500 ते 1,000 किलो वाळवलेली फुले विक्रीसाठी पाठवतात. यामधून त्यांना अंदाजे 1 लाख ते 4 लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो. हा व्यवसाय आता केवळ त्यांच्यापुरता मर्यादित न राहता 400 ते 500 शेतकऱ्यांच्या नेटवर्कपर्यंत पोहोचला आहे. अनेक लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना यामुळे स्थिर उत्पन्नाचा नवा मार्ग मिळाला आहे. विशेष म्हणजे या कामात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीही झाली आहे.
शिवराज निषाद यांनी शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन महत्त्वाचे ठरले आहे. ताजी असो वा सुकवलेली, शेतकऱ्यांची फुले योग्य दरात खरेदी केली जातील, ही खात्री त्यांनी दिली आहे. परिणामी, संपूर्ण परिसरातील कृषी अर्थव्यवस्थाच बदलून गेली आहे. टाकाऊ समजल्या जाणाऱ्या फुलांमधून शाश्वत व्यवसाय उभारून शिवराज निषाद यांनी शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श उभा केला आहे.
