सिंधुदुर्ग: कोकणचा प्रदेश हा निसर्ग संपन्न असल्याने नेहमीच इकडे पर्यटकांचा ओढा असतो. कोकणातील समुद्र, वनराई, वन्यजीव, ऐतिहासिक किल्ले आणि एकंदरीत निसर्ग हेच पर्यटकांचं आकर्षण केंद्र राहिलं आहे. अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुळसुलीचं एक कृषी पर्यटन केंद्र देखील पर्यटकांना भूरळ घालतंय. कुडाळ येथील गजानन गंगाराम कुडाळकर यांनी शेतीच्या आवडीतून हे नंदनवन फुलवलं आहे. आता या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. याबाबतच कुडाळकर यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
advertisement
गजानन कुडाळकर हे मुळचे कुडाळचे असून त्यांना लहानपणापासूनच शेतीची आवड आहे. शेतीत काहीतरी वेगळं करण्याची त्यांची इच्छा होती. पण त्यांच्याकडे स्वत:ची शेतजमीन नव्हती. त्यामुळे त्यांनी कुडाळ तालुक्यातील तुळसुली या गावात 1990 मध्ये 35 एकर जमीन घेतली. या जमिनीत त्यांनी एक हजार नारळ आणि 4 हजार सुपराची झाडे लावली. काही काळात या ठिकाणी नंदनवन फुलल्याचं चित्र तयार झालं.
कृषी पर्यटन केंद्र सुरू
कुडाळकर यांना नारळ आणि सुपारीच्या शेतीतून चांगलं उत्पन्न मिळत होतं. परंतु, काही मित्रांनी त्यांची शेती पाहून शेतीला जोडधंदा म्हणून पर्यटन केंद्र सुरू करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कुडाळकर यांनी आपल्या शेतात एक कॉटेज उभारलं. त्याला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हळूहळू कॉटेजची संख्या वाढवत नेली. त्यात अगदी एसी, नॉन एसी अशी सोय देखील उपलब्ध करून दिली. त्यामुळे तुळसुलीच्या या कृषी पर्यटन केंद्राकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे.
लाखोंची कमाई
सध्या कुडाळकर यांच्या कृषी पर्यटन केंद्रात एकूण 25 कॉटेज आहेत. यामध्ये स्विमिंगपूल, हॉल देखील उभारला आहे. याला लोकांची मोठी मागणी देखील असते. या व्यवसायातून आर्थिक फायदा तर होतोच, त्यासोबत 20 ते 25 जणांना रोजगार देखील प्राप्त झाला आहे. यातून वर्षाकाठी 50-60 लाख रुपयांचे उत्पन्न मिळतेय. तसेच स्वतःच्या बागेत हा व्यावसाय करण्याचे एक वेगळं समाधान देखील मिळत आहे, असं कुडाळकर सांगतात.