राज्यातील लातूर, अकोला, हिंगोली आणि उमरखेड येथे सोयाबीनची मागणी आजही उच्च पातळीवर राहिली. दुसरीकडे चंद्रपूर, मालेगाव आणि पाटोदा येथे आवक अत्यल्प होती. सोयाबीनच्या विविध जातींमध्येही मागणीत फरक दिसून आला. पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक पसंती मिळत असून लातूर, अकोला, हिंगोली, उमरखेड आणि उमरगा येथील बाजारांमध्ये त्याचे भाव तुलनेने जास्त राहिले. स्थानिक (लोकल) सोयाबीनला अमरावती, सोलापूर आणि नागपूरमध्ये स्थिर मागणी होती, तर धुळे बाजारात हायब्रीड सोयाबीनची आवक कमी असून दर स्थिर आहेत.
advertisement
अहिल्यानगरमध्ये आज सोयाबीनचा सर्वसाधारण दर ३ हजार ८७५ रुपये होता. जळगाव, बार्शी, आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दर अनुक्रमे ३७००, ३८०० आणि ३८३४ रुपये इतके राहिले. अमरावती आणि सोलापूरमध्ये लोकल सोयाबीनचे दर अनुक्रमे ३७५० आणि ३८०० रुपये प्रति क्विंटल नोंदले गेले. नागपूर आणि हिंगोली बाजारातही दर ४१०० रुपयांच्या आसपास होते.
लातूर आणि अकोला येथे पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक दर मिळाले. लातूरमध्ये ४४८१ रुपये तर अकोलामध्ये ४३५५ रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांक पाहायला मिळाला. तुळजापूर बाजारात दर ४१०० रुपये स्थिर राहिले. तसेच उमरखेड आणि उमरगा या ठिकाणीही सोयाबीनचे दर ४२०० रुपयांच्या आसपास होते.
राज्यातील काही भागांमध्ये सोयाबीनचे उत्पादन पावसाच्या अनिश्चिततेमुळे कमी झाले असून त्यामुळे पुरवठा घटला आहे. परिणामी, चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला दरात स्थिरतेसोबत थोडी वाढ जाणवतेय. कृषी तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या स्थितीत शेतकऱ्यांनी विक्रीस घाई न करता बाजारातील मागणी व दरांचा अभ्यास करूनच माल विक्रीस आणावा. पुढील काही दिवसांत दरात थोडी वाढ होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
शेतकऱ्यांना सोयाबीन काढणीदरम्यान ओलावा नियंत्रणावर विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. पावसाळ्यानंतर साठवणीसाठी कोरडे व हवेशीर ठिकाण निवडावे, तसेच दाण्यांची तुटफूट टाळण्यासाठी यंत्रांद्वारे काढणी करताना गती नियंत्रित ठेवावी. योग्य प्रतीचा माल तयार केल्यास बाजारात अधिक दर मिळण्याची शक्यता वाढते.
सध्याची बाजारस्थिती पाहता, राज्यात सोयाबीनचे भाव स्थिर असून चांगल्या प्रतीच्या पिकाला चांगला दर मिळत आहे. पुढील आठवड्यातही दरात मोठ्या चढ-उताराची शक्यता नसल्याचे व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.