या कायद्याची सुरुवात 1939 मध्ये झाली. त्यानंतर 1948 मध्ये ‘मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम’ अस्तित्वात आला. पुढे 2012 मध्ये या कायद्याचं नाव बदलून ‘महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम’ करण्यात आलं.
‘कूळ’ म्हणजे नेमकं कोण?
कुठल्याही जमीन मालकाच्या जमिनीवर जो व्यक्ती अधिकृतपणे व कायदेशीररित्या प्रत्यक्ष कष्ट करून शेती करतो, तो त्या जमिनीचा ‘कूळ’ म्हणून ओळखला जातो. याची नोंद गाव नमुना 7-अ मध्ये केली जाते आणि सातबारा उताऱ्यावर उजव्या बाजूच्या रकान्यात ‘कुळ, खंड व इतर अधिकार’ या ठिकाणी नोंद असते. या जमिनींना भोगवटादार वर्ग-2 म्हणून वर्गीकृत केलं जातं. याचा अर्थ असा की, अशा जमिनींचं हस्तांतरण (विक्री) सरकारी परवानगीशिवाय करता येत नाही.
advertisement
वर्ग-2 वरून वर्ग-1 मध्ये जमिनीचं रूपांतर कसं करावं?
जर कुळाला स्वतःच्या नावावर जमीन कायमस्वरूपी घ्यायची असेल, तर त्याने भोगवटादार वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये जमीन रूपांतरित करायची प्रक्रिया सुरू करावी लागते. यासाठी तहसील कार्यालयात तहसीलदाराकडे अर्ज करावा लागतो. तहसीलदार हे या प्रक्रियेचं अधिकृत प्राधिकरण आहेत.
लागणारी कागदपत्रं कोणती?
संबंधित जमिनीचे 1960 पासूनचे सातबारा उतारे
फेरफार नोंदींच्या प्रती
खासरा पत्रक
कुळाचं प्रमाणपत्र
कुळ चालू असल्याचं चलन / दस्त
कुळाचा फेरफार दाखवणारे पुरावे
पुढील प्रक्रिया काय?
अर्ज केल्यानंतर,तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला जातो. त्यानंतर, सार्वजनिक जाहीर प्रगटन दिलं जातं – म्हणजे जमिनीबाबत कोणाला आक्षेप आहे का हे तपासलं जातं. कुणी हरकत घेतली नाही, तर संबंधित अर्जदारास सुनावणीसाठी बोलावलं जातं. सर्व प्रक्रिया पूर्ण झाली, की सुमारे 1 महिन्याच्या आत सातबारा उताऱ्यावरून ‘कुळ’ नोंद वगळून, त्या जमिनीला भोगवटादार वर्ग-1 असा दर्जा दिला जातो. हे लक्षात घ्या की ही नोंद फक्त अर्जदाराच्या जमिनीपुरतीच मर्यादित असते. म्हणजे, जर संपूर्ण गटाचा कूळ एकच असेल, तरी वर्ग-1 नोंद फक्त अर्ज केलेल्या भागापुरती होते.
दरम्यान, कुळवहिवाट कायदा हा शेतकऱ्यांच्या हक्कांचं संरक्षण करणारा मजबूत आधार आहे. जर तुम्ही दुसऱ्याच्या जमिनीवर अनेक वर्षे शेती करत असाल, तर या कायद्याचा फायदा घेऊन तुम्ही स्वतःच्या हक्कांची जमीन मिळवू शकता. फक्त योग्य प्रक्रिया, कागदपत्रं आणि स्थानिक तहसील कार्यालयाचा सल्ला घेतल्यास तुमचाही शेतजमिनीवरचा हक्क अधिकृतरित्या नोंदवला जाऊ शकतो.