राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य देण्यात आले असून शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणे आणि शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ काय आहे?
सरकारने जाहीर केलेल्या या योजनेनुसार ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. अशा शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज राज्य सरकारकडून माफ केले जाईल. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान केली.
advertisement
गेल्या काही वर्षांत बदलते हवामान, अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चात वाढ तसेच बाजारभावातील चढउतार यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे कर्जफेड करणे कठीण झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन
कर्जमाफीसोबतच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारने प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. जे शेतकरी वेळेवर कर्जफेड करतात त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
या निर्णयामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल आणि भविष्यातही वेळेवर कर्जफेड करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
