नोकरीचा त्याग केला
अनुष्काने 2017 मध्ये दिल्लीतील हिंदू कॉलेजमधील प्लेसमेंट राऊंडदरम्यान कोणतीही नोकरी स्वीकारली नाही. फ्रेंच विषयात सेंट स्टीफन्स कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतरही तिला समाधान नव्हते. तिचं ध्येय वेगळं होतं जमिनीशी नातं जोडत काहीतरी नवीन घडवण्याचं. त्यामुळेच तिने दिल्लीतील चमकदार करिअरला पाठ फिरवत घरच्या लखनऊला परतण्याचा निर्णय घेतला.
चहा पिताना सुचली आयडीया
advertisement
घरी परतल्यानंतर तिच्या आयुष्यात मोठा बदल घडवणारा क्षण अचानक समोर आला. छतावर काही छोटी झाडं टोमॅटो,भाजीपाल्याची रोपे लावण्याचा प्रयोग केला. या कामात मिळालेल्या आनंदाने तिला स्वतःची खरी आवड ओळखली. त्यानंतर तिने शेतीला आयुष्याचं ध्येय मानायला सुरुवात केली.
एकदा संध्याकाळी चहा घेताना तिने आपली आयडीया भावाला सांगितली. भावाने पूर्ण पाठिंबा देत तिचा आत्मविश्वास वाढवला. प्रोत्साहनामुळे अनुष्काने नोएडा येथील इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर टेक्नॉलॉजीमध्ये हॉर्टिकल्चरचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे काही विशिष्ट कृषी अभ्यासक्रमांमुळे तिची आवड संरक्षित शेतीकडे वळली. सखोल संशोधनानंतर 2020 मध्ये तिने एक एकर जमिनीवर पहिले पॉलीहाउस उभारले आणि तिच्या ‘ग्रीन जर्नी’ची सुरुवात झाली.
२४ व्या केली सुरुवात
केवळ 24 व्या वर्षी अनुष्काने काकडीच्या पिकापासून शेतीची सुरुवात केली. पहिल्या हंगामात तब्बल 51 टन उत्पादन घेऊन तिने पारंपरिक शेतीपेक्षा तीन पट जास्त उत्पादनाचा विक्रम केला. प्रारंभीच्या यशामुळे प्रेरित होऊन तिने लाल आणि पिवळ्या ढोबळी मिरचीचे उत्पादन सुरू केले. पहिल्याच वर्षी एक एकरात 35 टन उत्पादन घेतले आणि ते प्रति किलो 80 ते 100 रुपये दराने विकले. आज ती दरवर्षी 200 टनांहून अधिक ढोबळी मिरची बाजारात आणते.
गेल्या पाच वर्षांत अनुष्काने लखनऊ आणि आसपासच्या परिसरात आपल्या उच्च दर्जाच्या भाज्यांसाठी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आज तिच्या मालकीची शेती ६ एकरांवर पसरली असून पॉलीहाउसच्या मदतीने वर्षभर दर्जेदार भाजीपाला उत्पादन होते.
१ कोटींपेक्षा जास्त उलाढाल
2023-24 या आर्थिक वर्षात अनुष्काने १ कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल केली. तिच्या भाज्यांची विक्री Blinkit, Big Basket सारख्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तसेच Lulu Hypermarket यांसारख्या मोठ्या स्टोअर्समध्ये होते. दिल्ली आणि वाराणसीच्या बाजारपेठांमध्येही तिची उत्पादने मोठ्या प्रमाणात मागणीला आहेत.
३० लोकांना दिला रोजगार
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अनुष्का आपल्या शेतावर २५ ते ३० लोकांना रोजगार देते, त्यातील बहुतेक महिला आहेत. शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, अभ्यास आणि मेहनत यांच्या जोरावर ही तरुणी आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
