जालना: आपण आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक असू आणि कष्ट करण्याची जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हेच सिद्ध करून दाखवलंय जालना जिल्ह्यातील एका तरुणानं.
जालन्याच्या सावरगावातील हमालाचा मुलगा भारतीय सैन्य दलात दाखल झालाय. त्याचे वडील परमेश्वर आढाव हे बिस्कीट कंपनीत हमाल म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा ओम आढाव हा मागील 3 वर्षांपासून भारतीय सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आलं. निवड होताच त्याची गावभर आनंदानं मिरवणूक काढण्यात आली.
advertisement
जालन्याच्या रामनगर परिसरातील हडपसर गावात परमेश्वर आढाव हे मिळेल ते काम करतात. मागील काही वर्षांपासून ते रामनगर इथं खत दुकानावर हमालीचं काम करायचे. सध्या इथं फार काम नसल्यानं ते बिस्किट कंपनीत हमाली करतात. त्यांचा मुलगा ओम आढाव यानं दहावीनंतर सैन्य भरतीची तयारी सुरू केली. गावातील मित्रांसोबत तो सकाळी साडेपाच वाजता उठून धावण्याचा सराव करायचा. अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करायचा. 2 वेळा त्याला अपयश आलं, मात्र कुटुंबियांच्या प्रोत्साहनानं त्यानं मेहनत सुरू ठेवली. घरच्यांच्या विश्वासामुळेच अखेर देशसेवेचं त्याचं स्वप्न साकार झालंय.
ओमची आई शेतमजुरी करते. वडिलांच्या नजरेआड तिनं वाचवलेले पैसेच त्याच्या शिक्षणासाठी कामी आले. आता आपल्या लेकानं मन लावून देशसेवा करावी आणि घराचं नाव मोठं करावं अशी या माऊलीची इच्छा आहे. 'आमच्या 4 पिढ्यांमध्ये कोणीही सरकारी नोकरीत किंवा सैन्यात दाखल झालं नाही, ते माझ्या मुलानं करून दाखवलंय याचा सार्थ अभिमान आहे, असं परमेश्वर आढाव यांनी सांगितलं. दरम्यान, सध्या ओमवर शुभेच्छांचा प्रचंड वर्षाव होतोय.