छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील दरेगावचा छोट्याशा गावातील समाधान गायकवाड आहे. समाधानने पदवीपर्यंत शिक्षण सावंगी या ठिकाणाहून पूर्ण केले. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. घरी शेती आहे पण कोरडवाहू. वडील गावामध्ये चहाची टपरी चालवतात तर आई इतरांच्या घरी जाऊन मोलमजुरीचे काम करते.
सकाळी दहा वाजेपर्यंत समाधानचे वडील चहाची टपरी चालवतात, त्यानंतर लोकांच्या शेतात जाऊन मोलमजुरीचे काम करतात. घरची परिस्थिती चांगली नव्हती त्यामुळे समाधानाने नोकरी केली आणि नोकरी करत करत त्यानंतर शिक्षण पूर्ण केले. त्यासोबतच त्याने पीएसआय पदाची पूर्ण तयारी देखील केली.
advertisement
समाधान सांगतो की, आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती त्यामुळे लवकर नोकरी करावी लागली. नोकरी केली, खूप कष्ट केले आणि ज्या दिवशी कंपनीला सुट्टी असायची त्या दिवशी अभ्यास करायचो, त्या दिवशी मी पूर्ण अभ्यास करायचो.
मी ज्या कंपनीत काम करायचो. तिथल्या सरांनी देखील मला खूप मदत केली, आर्थिक मदत देखील केली. त्यासोबत माझे जे मित्र होते त्यांनी देखील मला खूप आर्थिक मदत केली. मी आधीच पोलीस भरतीची तयारी केली पण दोन मार्कांनी माझी पोलीस भरती हुकली. त्यानंतर मी राज्यसेवेची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात मी पीएसआय झालो. माझ्या आजोबांची खूप इच्छा होती की मी सरकारी अधिकारी व्हावे आणि आज त्यांची इच्छा पूर्ण झाली. आज माझे आजोबा असते तर त्यांना मी घट्ट मिठी मारली असती, असे देखील समाधान म्हणाला.
सध्या समाधान पीएसआय झालेला आहे पण त्याला डीवायएसपी व्हायची इच्छा आहे, तर त्यासाठी देखील तो तयारी करणार आहे, असे देखील त्याने सांगितले आहे. अत्यंत हलाखीची परिस्थिती होती. त्यांच्या घरी कुठलेही नातेवाईक येत नव्हते, त्यांना त्यांची लाज वाटायची कारण त्यांचे घर देखील तेव्हा चांगले नव्हते. लोक आमच्याकडे यायला लाजायचे. पण ज्या दिवशी मी पीएसआय झालो त्यादिवशी सर्वच नातेवाईकांनी आम्हाला फोन करून शुभेच्छा दिल्या. जे लोक बोलत नव्हते ते देखील आम्हाला बोलायला लागले आणि आज मी पीएसआय झाल्याचा आनंद आहे पण आमची परिस्थिती देखील बदलणार आहे यामुळे मला जास्त आनंद आहे, असे समाधान म्हणाला आहे.





