अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये टोळीच्या वर्चस्ववादामुळे एका मुलाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर मृतदेह केकताईयी डोंगरावर नेऊन मृतदेह जाळण्यात आला आणि त्याची हाडेही जाळून टाकली गेली. त्याची राख ओढ्यात फेकून देण्यात आली. या प्रकरणामुळे एमआयडीसी परिसरात मोठी दहशत पसरली आहे.
अहिल्यानगर एमआयडीसीमध्ये दोन टोळ्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे. टोळ्यांमध्ये सदस्यांना गाठून मारण्याचे प्रकार सध्या सुरू आहे. त्यातूनच वैभव उर्फ सोन्या नायकोडी या 19 वर्षीय तरुणाचे 22 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दहा जण अपहरण करून त्याला नगरपासून जवळ असलेला गोल्डन सिटी या लेआउटमध्ये निर्जनस्थळी नेऊन त्याला लेआउटच्या चेंबरमध्ये टाकून मारहाण करण्यात आली. त्याच्याबरोबर त्याच्या एका मित्रालाही अपहरण करून आणण्यात आले होते. या दोघांनाही नऊ ते दहा जणांनी एकत्र येऊन जबर मारहाण केली.
advertisement
हाडही जाळून टाकली
एवढ्यावरच आरोपी थांबले नाही चेतना नगर येथील प्लॉटवर नेऊनही मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये वैभव नायकोडी याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी लाकूड आणि 35 लिटर डिझेलच्या साह्याने त्याचा मृतदेह जाळून टाकला त्यानंतरही हाड जळत नाही म्हणून त्या हाडांवर डिझेल टाकून हाडही जाळून टाकली आणि त्याची राख ओढ्यात नेऊन सोडून दिली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये वैभव नायकवडी यांच्या आईच्या फिर्यादीवरून अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांची भूमिका संशयास्पद
या प्रकरणांमध्ये अपहरणाची घटना घडल्यावर दोन दिवसांनी वैभव नायकोडी याचे नातेवाईक फिर्याद देण्यासाठी गेले असता त्यांची फिर्याद घेण्यास टाळाळ केला असा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. उशिरा फिर्याद घेतल्यानंतरही स्थानिक पोलिसांनी योग्य तपास केला नसल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे.
नगरमध्ये प्रथमच टोळी युद्धातून हत्या
मुळात म्हणजे या प्रकरणातील सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत त्यामध्ये सर्वच आरोपींवर अल्पवयीन असताना गुन्हे दाखल आहेत. नगरमध्ये प्रथमच टोळी युद्धातून ही पहिली हत्या आहे. याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकरणांमध्ये तीन पोलिसांची चौकशी होणं महत्त्वाचं आहे,
पोलिसांची पण चौकशी करा, नातेवाईकांची मागणी
पीडित कुटुंब फिर्याद देण्यासाठी गेले असता त्यांना योग्य वागणूक दिली नाही. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं मात्र त्याची सखोल चौकशी न करता वैभव पळून गेल्याच्या माहितीवर स्थानिक पोलिसांनी विश्वास ठेवून दोन दिवस तपास केला नाही तपासाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला तुमचा मुलगा आरोपी आहे हे माहीत असतं तर आम्ही तुमची फिर्याद घेतली नसती असं सांगितलं गेलं. पोलीस अधीक्षक यांच्याकडे जो अहवाल जातो त्या अहवालानुसार त्यांनी यामध्ये काहीतरी घटना घडल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सखोल चौकशीचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. त्यामुळे तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांची चौकशी व्हावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
